नाशकात दत्ता गायकवाड तर जळगावात वाघ यांच्यावर ठाकरेंनी दाखवला विश्वास:संभाजीनगरात सचिन घायाळांवर मोठी जबाबदारी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात चार नवीन नेत्यांना मोठी संधी देत जबाबदारी दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात गुलाबराव वाघ तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सचिन घायाळ यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात दत्ता गायकवाड यांना पक्ष संघटनेत मोठी ताकद देण्यात आली असून रत्नागिरी आणि कोकण विभागात देखील सुरेंद्र नाथ माने यांच्यावर देखील पक्षाने विश्वास दाखवला आहे. नासिक जिल्ह्यातील मोठ्या घडामोडी समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात अनेक हालचाली दिसून येत आहेत. नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा पदाधिकारी पक्षात नाराज असल्याचा दावा सुधाकर बडगुजर यांच्या वतीने करण्यात आला होता. यानंतर बडगुजर यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीने दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील चार प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी संदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना, पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांना उपनेतेपदी संधी देण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली. गुलाबराव वाघ यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा) व नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजप मधूनही बडगुजर यांना विरोध स्वत:सह मुलावरील गंभीर आरोप धुऊन घेण्यासाठी भाजपच्या वाटेवरील उबाठाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेने बुधवारी पत्रकार परिषदेत लाइव्ह हकालपट्टी केली. त्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेनेही बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला जाहीर आक्षेप घेतल्याने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारे संकटमोचक गिरीश महाजन स्वत:च संकटात सापडले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी बडगुजर यांनी भेट घेतल्यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा बुधवारी सकाळी क्लायमॅक्स घडला. देशद्रोही सलीम कुत्तासोबत नाच करणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका शिंदे सेनेने घेतली तर 17 प्रकारचे गुन्हे असणाऱ्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी थारा देऊ नये, असे भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बजावले आहे.

  

Share