राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आजपासून राज्यव्यापी ‘मंडल यात्रेला’ सुरुवात झाली आहे. आज नागपूरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते या ‘मंडल यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुढील 40 दिवस राज्यातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यात 14 हजार 877 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. मात्र, यात्रेच्या शुभारंभावेळी जयंत पाटील अनुपस्थित राहिल्याने चर्चेंना उधाण आले आहे. तर या यात्रेवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. जयंत पाटील गैरहजर, चर्चांना उधाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेला आज नागपूर येथून औपचारिक सुरुवात झाली. या यात्रेच्या उद्घाटनावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हजर होते. मात्र, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गैरहजेरी होती. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील हे भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या यात्रेतील अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील हे वसंतदादा साखर संघाच्या बैठकीसाठी पुण्यात असल्याने ते मंडल यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. तरीसुद्धा, त्यांच्या गैरहजेरीने राजकीय वातावरणात नवे अंदाज वर्तवले जात आहेत. लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर जोरदार टीका दुसरीकडे, या मंडल यात्रेवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ‘अघटित घडली यात्रा, लांडगं निघालं तीर्था!’ अशा शब्दांत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार मंडल आयोगाबाबत अर्धसत्य सांगत असून, त्यांना ही यात्रा काढण्याचा अधिकार कुणी दिला? शरद पवार आणि ओबीसींचा संबंध काय? असे प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारले. मंडल यात्रा काढण्यामागचा उद्देश स्पष्ट करावा “महाराष्ट्रात पंचायत राज्य निवडणुका लागल्या आहेत. ज्या दिवशी या निवडणुका होणार असे कळले तेव्हापासून अनेक नेते बाहेर येऊ लागलेत. आज नागपूरमधून मंडल आयोग यात्रा सुरू झाली. आज एका नेत्याचा ओबीसींबद्दल कंठ दाटून आला. त्यांचा आणि ओबीसींचा काहीही संबंध नाही. आज ज्या नेत्यांनी मंडल यात्रा काढली ती कशाकरता काढली, त्याचा उद्देश काय हे स्पष्ट करावा,” असेही लक्ष्मण हाके म्हणालेत. शरद पवारांना मंडल आयोग का हवा? ओबीसींनी पवारांकडून कधीही काही मागितले नाही. आज गावातला ओबीसी देशोधडीला लागला आहे. आज सगळ्यांना कंठ दाटून आला आहे. आज उठसूट सगळे ओबीसी बाजूने उभा राहत आहेत. पवारांनी राजसत्ता कुटुंबाबाहेर जाऊ दिली नाही, त्यांना मंडल आयोग का हवा आहे? असाही सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.