समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पूर्ण:शक्तिपीठ महामार्गालाही वेग मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला निर्धार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर नागपूर ते मुंबईचा प्रवास आता विनाअडथळा आणि केवळ आठ तासांत शक्य होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तिपीठ महामार्ग पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला. 12 जिल्ह्यांमधून जाणारा आणि तीन प्रमुख शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग राज्यातील धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींना नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? मराठवाड्याचे आर्थिक आणि औद्योगिक चित्र बादलणारा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करताना त्यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले, 2014 ला आम्ही जे स्वप्न बघितले त्याची पूर्तता आज होते आहे. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राचे 24 जिल्हे जेएनपीटी सोबत कनेक्टेड आहेत. ते वाढवण सोबत आम्ही जोडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्याचे, दादा भुसे यांनी तिसऱ्या टप्प्याचे तर मी याच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करत आहे. या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटचा टप्पा 76 किमी आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. हा सर्वात जास्त लांबीचा हा बोगदा आहे. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात 200 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल हा स्मार्ट म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक 10 लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी 2 लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत. जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की महायुतीच्या काळात याचे लोकार्पण केले आहे. यापुढे आपल्याला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. मराठवाड्याचे आर्थिक आणि औद्योगिक चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. असा असणार शक्तिपीठ महामार्ग विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किमीचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

  

Share