शक्तिपीठ महामार्ग रद्द करा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, अर्थसंकल्पाची केली होळी

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करावी तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या प्रमुख मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्याच्या अर्थसंकल्पनाच्या प्रतीची होळी करून होळीच्या भोवती सरकारच्या विरोधात बोंबा मारत सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गावर ठाम असल्याने हा महामार्ग शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी तुघलकी निर्णय ठरणार आहे. ज्या पद्धतीने महमद तुघलकाने अनेक विक्षिप्त तुघलकी निर्णय घेऊन प्रजेला वेठीस धरले तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत असल्याचा घणाघात मुंबई येथील आझाद मैदानात झालेल्या शक्तीपीठ विरोधी मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. शेतकरी-भाविकांकडून महामार्गाची मागणी नाही राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने 86 हजार कोटी रूपये खर्च करून शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे. राज्यातील कोणत्याही व्यक्तीने, शेतकऱ्याने किंवा भाविकाने महामार्गाची मागणी केली नाही. सध्या रत्नागिरी-नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने तोट्यात चाललेला आहे. तरीही राज्य सरकार शक्तिपीठ करण्यावर ठाम असल्याने यामध्ये राज्य सरकारचा हेतू स्वच्छ दिसत नाही. एकीकडे 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी सर्वांची टक्केवारी देवून भ्रष्ट्राचार करून 35 कोटी रूपये खर्च येत असताना शक्तिपीठ मात्र 107 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येत आहे. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठला विरोध असताना सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. हा संशोधनाचा विषय- शेट्टी राजू शेट्टी म्हणाले की, सांगली व कोल्हापूर जिल्हा या शक्तिपीठ महामार्गामुळे महापूराच्या भीषण परिस्थितीत सापडणार आहे. औद्योगीक क्षेत्रासह लाखो एकर शेतजमीन व हजारो कुटुंबे यामुळे उध्वस्त होणार आहेत. औदुंबर ते आदमापूर या 72 किलोमीटर मध्ये जवळपास 20 ते 24 किलोमीटर भरावाचा पूल होणार आहे. याबाबत कोणत्याच उपाययोजना रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकार जनतेला व सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून एवढ्या गोष्टी का करत आहे हा संशोधनाचा विषय आहे.

  

Share