राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये केवळ शेतकऱ्यांचा विषय हा एकच संवाद झाला आहे. पुढील आंदोलन आणखी कसे व्यवस्थित होईल, यावर आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या संदर्भात कडू यांनी म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेले हे आंदोलन केवळ बच्चू कडू यांच्या नावापुरते न ठेवता हे शेतकऱ्यांसाठी असलेले आंदोलन म्हणून कसे पुढे जाईल, असा आमचा प्रयत्न आहे. मी मोठे होणे हा फार महत्त्वाचा विषय नाही. मात्र, शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे. सरकार त्यांची टिंगल बाजी करत आहे, हे अतिशय चुकीचे असल्याचे कडू यांनी म्हटले आहे. दुष्काळ पडला तर आपण कर्जमाफी जाहीर करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. म्हणजे दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पहावी का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला आहे. शेत मालाला भाव भेटत नाही, हे दुष्काळापेक्षा जास्त मोठे नुकसान आहे. मागील दोन वर्षांपासून भाव भेटलेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. हा विषय फडणवीस यांच्या लक्षात यावा यासाठी आंदोलन सुरू असल्याचे कडू यांनी म्हटले आहे. राजकारणात शेतकरी नेते यशस्वी होत नाहीत शेतकरी निवडणुकीत एकत्र राहत नाही, हे दुर्दैव आहे. मात्र आम्ही याकडे राजकारण म्हणून पाहत नाही. राजू शेट्टी असेल आम्ही असो, सर्वजण शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. मात्र राजकारणात शेतकरी नेते यशस्वी होत नाहीत. हे दुर्दैव राहिले असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीचा विषय आता काढणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय देणे जास्त महत्त्वाचे वाटत असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.