तुमची बुद्धी किती आणि तुम्ही बोलता किती?:एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणे आपल्या संस्कारात बसते का?, शिवसेनेचा रोहिणी खडसेंवर पलटवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवली. तसेच त्यांनी विशेष विमानसेवा सुरू करून महाराष्ट्रात पर्यटकांना परत आणण्याचे काम देखील केले. यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान केले होते. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका, अशी टीका त्यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी रोहिणी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले, रोहिणी खडसे यांची मला दया येते. रोहिणी ताई तुमचा आवाका किती? तुमची बुद्धी किती आणि तुम्ही बोलता किती? बापाच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात तग धरून आहात. एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांनी विमान पाठवले नसते तर माझे विमान कधीच स्वर्गात उडाले असते. रोहिणीताई एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेले विमान किंवा एअर ॲम्बुलन्स एकनाथ खडसे यांचा प्राण वाचवतो. आपल्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणे आपल्या संस्कारात बसते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाघमारे पुढे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः खर्च करून चार विमान पाठवली. रोहिणी ताई तुमचा अभ्यास कमी पडतो. थोडा अभ्यास करून बोलत जा. जे कोणी कधीही विमानात बसले नाही त्यांना आम्ही विमानात आणले तर तुम्हाला मुंग्या का लागल्यात? तुमच्या पक्षप्रमुखांनी साधी संवेदना सुद्धा व्यक्त केली नाही. त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचा का? नेमके काय म्हणालया होत्या रोहिणी खडसे? एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना रोहिणी खडसे म्हणालया होत्या की, दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना, खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. महाराष्ट्रातील जनता उपकाराची भाषा सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना बसवून जनतेने त्यांच्यावर उपकार केले आहेत, त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका. ज्या विमानातून तुम्ही लोकांना आणलेत, ती सेवा लोकांच्या कररूपात मिळालेल्या निधीतून चालवली जाते. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक पैसे खर्च केलेले नाहीत. त्यामुळे ‘उपकार’ केल्याची भाषा वापरणे हे पूर्णतः अनुचित आणि असंवेदनशील आहे.

  

Share