शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र:महावितरणचा 20 वा वर्धापन दिन, विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन 1 ते 6 जून 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जून 2025 रोजी महावितरण कंपनीचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठवणे, भित्तिपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांमध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद वाक्य घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात 1 ते 6 जून 2025 दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (1 जून) सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजूषा जाहीर करण्यात आली आहे. या प्रश्नमंजूषेत सहभागी होणाऱ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महावितरण कार्यालय/रोहित्र पेटी/आर. एम. यू./डिजिटल बोर्ड/शिडी गाडी/उपकेंद्र/तक्रार निवारण केंद्र/ग्राहक सुविधा केंद्र/रहिवासी परिसर इ. ठिकाणी विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावण्यात येणार असून समाज माध्यमांद्वारे, रेडिओ, टी.व्ही., प्रिंट मिडिया तसेच इतर माध्यमे उपयोगात आणून विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवारी (2 जून) राज्यातील 650 उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येईल. ग्राहकांना विद्युत सुरक्षेविषयी ई-मेल पाठवणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती, मंगळवारी व बुधवारी (3 व 4 जून) रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षेविषयी निबंध/चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी/अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षेविषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 5 जून वसुंधरा दिनी 150 विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचतीविषयी रॅली काढण्यात येणार आहे. 6 जून रोजी सकाळी 10 ते 10.15 या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्रांसाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

  

Share