11 वी प्रवेशाच्या पोर्टलची सुविधा 4 दिवस बंद:शिक्षण महामंडळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर; 26 मे ते 3 जून कालावधीत होणार प्रवेश प्रक्रिया

11 वी प्रवेशाच्या पोर्टलची सुविधा 4 दिवस बंद:शिक्षण महामंडळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर; 26 मे ते 3 जून कालावधीत होणार प्रवेश प्रक्रिया

राज्यातील 11 वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्यापही थांबलेला नाही. शिक्षण संचालनालयाने अखेर या प्रक्रियेबाबत नव्या तारखा जाहीर केल्या असून, आता विद्यार्थ्यांना अकरावीच्या 26 मे पासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. सुरुवातीला 21 मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र वेबसाईटवरील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आणखी चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज आणि पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर, 5 जून रोजी पहिली “जनरल मेरीट लिस्ट” प्रकाशित केली जाईल. 6 आणि 7 जून या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना हरकती व तक्रारी नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 8 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे, तर प्रवेशाची पहिली फेरी 10 जूनपासून सुरू होईल, अशी माहिती शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे. फॉर्म भरताना अडचणींचा सामना 21 मेपासून सुरू होणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे सुरुच होऊ शकली नाही. अनेक विद्यार्थ्यांना वेबसाइट लोड न होणे, फॉर्म भरताना विविध अडचणी येणे, आणि पसंतीवे कॉलेज निवडता न येणे, अशा समस्या भेडसावत होत्या. यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला. राज्यस्तरावर यंदा प्रथमच संपूर्ण 11 वी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एकसंध प्रणाली तयार करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीच्या पहिल्याच वापरात तांत्रिक अडथळे विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणत आहेत. पोर्टलची सुविधा 4 दिवस बंद दरम्यान, पोर्टलच सुविधा ही 4 दिवस बंद राहणार आहे. त्यानंतर 26 मे ते 3 जूनपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया रावबली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा एकीकडे बोर्डाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा मारा, तर दुसरीकडे प्रवेशाची घाई, या दोन्हीमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि पालक दोघांनाही मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी आधीच अर्ज भरून ठेवले होते, मात्र प्रक्रिया स्थगित झाल्याने त्यांचा गोंधळ अधिक वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि डिजिटल प्रणालीचा उपयोग करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण संचालनालयकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment