59 सदस्यांचे शिष्टमंडळ 33 देशांना देणार भेट:सुप्रिया सुळे म्हणाल्या – आम्ही शांतता आणि सद्भावनेचा संदेश घेऊन जात आहोत, हेच आपले संस्कार

59 सदस्यांचे शिष्टमंडळ 33 देशांना देणार भेट:सुप्रिया सुळे म्हणाल्या – आम्ही शांतता आणि सद्भावनेचा संदेश घेऊन जात आहोत, हेच आपले संस्कार

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने 59 सदस्यीय शिष्टमंडळाची स्थापन केले आहे. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देणार असून तिथे जाऊन पाकिस्तानची पोलखोल करणार आहेत. या शिष्टमंडळाची 7 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गट 7 चे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. सुप्रिया सुळेंचा गट इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भेटी देणार आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हाला एमईए जी ब्रिफिंग देईल, त्यानुसार इतर देशांशी चर्चा केली जाईल. आमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आम्ही जे बोलणार आहोत, ते एक जबाबदार भारतीयाप्रमाणे सर्वसोबत मिळून चर्चा करणार आहोत. यासंदर्भात आम्हा 4 गटांना उद्या ब्रिफिंग दिली जाणार आहे. परवा आम्ही जाणार आहोत. परत आल्यानंतर त्यावर सविस्तर बोलता येईल. भारत नेहमीच शांतता आणि अमन पाहिजे असणारा देश राहिला आहे. हे आमचे संस्कार आहेत. भारत नेहमीच दहशतवादाविरुद्ध लढला आहे आणि पुढेही लढत राहील. परदेशात जाणारे आमचे सर्व खासदार शांतता आणि सुव्यवस्थाचा संदेश घेऊन जात आहेत. आपण कालही दहशतवादाच्या विरोधात होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. हगवणे कुटुंबाकडून पुरोगामी विचारांचा अपमान सुप्रिया सुळे यांनी यावेळी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरही भाष्य केले. समाज म्हणून आपल्याला काळिमा फासणारी घटना असल्याचे त्या म्हणाल्या. एकाच घरातील दोनही सुना जर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत असतील, तर एवढे शिक्षण घेऊन हगवणे कुटुंबाने काय केले? असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी म्हटले. पाश्चिमात्य कपडे घालूनही बुरसटलेले विचार गेलेले नसतील, तर शिक्षणाचा तरी काय उपयोग. हगवणेंच्या घरात काही क्रांती घडलीच नाही, असे वाटते. हगवणे कुटुंबाने पुरोगामी विचारांचा अपमान केला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. मी हगवणे कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी जाणे टाळले हगवणे कुटुंब हे माझ्याच लोकसभा मतदारसंघात मोडते. एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरातील एका कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी मला दिले होते. मात्र घरातील सुनांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली असल्याची माहिती मला होती, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाणे टाळले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही गेले नव्हते. ते काही वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाला नक्कीच गेले होते. पण तेव्हा हगवणे कुटुंबाबाबतची माहिती त्यांना नसावी, असेही त्या म्हणाल्या. हे प्रकरण माध्यमांनी लावून धरावे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी माध्यमांनी शौर्य दाखवत ती बातमी लावून धरली होती. म्हणूनच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरळीत होऊ शकला. त्याप्रमाणेच याही प्रकरणात माध्यमांनी वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण लावून धरावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. महाराष्ट्र सरकारनेही कडक कारवाई करून कोणत्याही कुटुंबाची सुनेला त्रास देण्याची हिंमत व्हायला नको, असेही त्या म्हणाल्या. बाळाची देखभाल आजी-आजोबांनी घेतलेली चांगली वैष्णवीच्या मृत्यूनंतर गेले सहा दिवस तिच्या बाळाचे हाल झाले, अशी माहिती आता समोर येत आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातल्यानंतर आज ते बाळ वैष्णवीच्या कुटुबांकडे सुपूर्द करण्यात आले. बाळाचा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. हगवणे कुटुंबिय तुरुंगात आहेत, काही सदस्य फरार आहेत. अशा वातावरणात मुल ठेवायची कुणाचीच हिंमत होणार नाही. त्यामुळे त्या बाळाची देखभाल आजी-आजोबांनी घेतलेली चांगली. कायदा आपले काम करेल. पण आम्ही माणुसकीच्या नात्याने आम्ही यात लक्ष घालू, असेही त्या म्हणाल्या.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment