6 हजार प्रवासी असल्याने लोकल एका बाजुला झुकते:मुंब्रा येथील वळण धोकादायक, प्रवासी संघटनेने मांडले वास्तव

रेल्वे प्रवासी संघटनेने मुंब्रा येथील रेल्वे ट्रॅकच्या धोकादायक वळणाचे वास्तव मांडले आहे. येथील वळणावर रेल्वे एका बाजुला झुकते, तब्बल 6000 प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असल्याने ट्रेन ओव्हरलोड होऊन एका बाजुला झुकते, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या सिद्धेश देसाई यांनी सांगितले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई म्हणाले, मुंब्राच्या वळणाबद्दल आधी सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. कारण, येथील वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, एका लोकलमध्ये 3600 प्रवासी प्रवास करतात. मात्र, पिक अवरमध्ये एका लोकलमधील संख्या 6000 पेक्षा जास्त होते. जेव्हा ही संख्या जास्त होते तेव्हा लोकलमध्ये लोड येऊन ती एका बाजूला झुकते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पुढे बोलताना सिद्धेश देसाई म्हणाले, आम्ही दिवा ते ठाण्यादरम्यान रेल्वे संख्या वाढवा हे वारंवार सांगतोय, पंतप्रधानांनी सुद्धा ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारे रेल्वे प्रशासनाने काम केले नाही. जे वळण निर्माण झाले आहे, त्यावर इंजिनियर सुद्धा काही करू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. संघटनेचा आंदोलनाचा इशारा मुंब्रा येथे झालेल्या लोकल ट्रेन दुर्घटनेनंतर प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रवासी संघटनांना भेटण्याची वेळ दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी आरोप केला आहे की, रेल्वे प्रशासन रेल्वे आणि ट्रॅकच्या देखभालीवर खर्च करण्याऐवजी अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च करत आहे. या संदर्भात, प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून भेटीची वेळ मागितली आहे. जर भेट नाकारली गेली, तर मोठ्या आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.