9370960061 पुण्यातील पर्यटकांसाठी प्रशासनाचा क्रमांक:264 पुणेकर पुलगावमध्ये अडकले; सर्वांना सुखरूप आणणार -मोहोळ

जम्मू-काश्मिरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत सर्व पर्यटकांना मुंबई आणि पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पर्यटकांनी काळजी करू नये, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे देखील ते म्हणाले. यासाठी श्रीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले असून त्यासाठी एक मदत कक्ष क्रमांक देखील त्यांनी जाहीर केला. या सर्व पर्यटकांनी 9370960061 या किंवा 020-26123371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पुणे कलेक्टर ऑफिस ने सुरु केलेल्या हेल्प लाइनवर आतापर्यंत कश्मीर मध्ये अडकलेल्या 264 जणांनी संपर्क साधला आहे. हा आकडा आणखीन वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेल्या 67 पर्यटकांचा एक ग्रुप पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे. या संदर्भात प्रशासन देखील अडकलेल्या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. स्पेशल विमान बुक करण्याचे प्रयत्न दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. आम्ही रात्रभर संपर्कात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महाराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आज दुपारी व्हाया मुंबई पुण्याला एक स्पेशल विमान येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यातील तीन-चार मोठे ग्रुप तेथे अडकले आहेत. या सर्वांशी आम्ही संपर्कात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या नागरिकांसाठी मुंबई मार्गे पुण्यात आणण्यासाठी स्पेशल विमान बुक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी देखील माहिती त्यांनी दिली. तात्काळ नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन महाराष्ट्रातील जे नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये अडकली आहेत त्या सर्व नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था आपण करत आहोत. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती आहे, ती आता निश्चितपणे कमी होत आहे. आम्ही त्या सर्व नागरिकांच्या संपर्कात आहोत, असे देखील मोहोळ यांनी सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आपले कोणी नातेवाईक किंवा मित्रपरिवार अडकलेले असतील तर त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन मोहोळ यांनी केले आहे.