संदीप क्षीरसागर म्हणाले- कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल:असे वाटत नाही; वाल्मीक कराडला VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप
![संदीप क्षीरसागर म्हणाले- कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल:असे वाटत नाही; वाल्मीक कराडला VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/26/new-project-2025-01-26t150114490_1737883944.jpg)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे भाष्य केले आहे. आता कृष्णा आंधळे सापडेल, असे मला वाटत नाही. पोलिसांना तो सापडायचा असता तर एव्हाना सापडला असता. पण आता तसे वाटत नाही, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. ते आज बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघाला होता. त्यावेळीही वाल्मीक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यासह 8 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजुनही पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज माध्यमांशी बोलताना कृष्णा आंधळेसह वाल्मीक कराडबाबत मोठे दावे करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
कृष्णा आंधळे आता पोलिसांना सापडेल, असे मला वाटत नाही. कारण त्या भागाचा जो काहाी इतिहास आहे, त्यावरून आंधळे सापडेल, असे वाटत नाही. पोलिसांना तो सापडायचा असता, तर आतापर्यंत सापडला असता. पण आता तसे वाटत नसल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात होता
वाल्मीक कराड सरेंडर होण्यापासून ते आता रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. धनंजय मुंडे मंत्रिपदी असल्यामुळे हे सर्व होत आहे. 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा निघाला, त्यावेळीही वाल्मीक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता. त्याठिकाणी वाल्मीक कराड दोन ते तीन दिवस होता, असा दावा देखील संदीप क्षीरसागर यांनी केला. लोक रस्त्यावर उतरल्यानंतर वाल्मीक कराड फरार झाला होता. वाल्मीक कराडला या रुग्णालयात कोणी ॲडमिट केले आणि तो अचानक का फरार झाला? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निःपक्ष पद्धतीने होण्यासाठी आणि प्रशासनाला मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. सीडीआर तपासामुळे साखळी जुळतेय
मी सुरुवातीपासून सीडीआर तपासा, असे सांगत होतो. आता त्यादृष्टीने पोलिस तपास करु लागल्यानंतर नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहेत. त्यामुळे तपासाची साखळी जुळत चालली आहे. वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतरही राज्यभरात मोर्चे काढून रोष व्यक्त केला जात आहे. यावरुन वाल्मीक कराड विरोधातील जन भावनेचा अंदाज येतो, असेही संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.