पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू:जिल्ह्याची मागणी करण्यामागे रहस्य दडले, एकनाथ खडसेंची टीका
महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली. मात्र, त्यानंतरपासून महायुतीमध्ये नाराजीचे सूर अधून मधून उमटताना दिसतच आहेत. सध्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रायगड व नाशिक येथील पालकमंत्र्यांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, पालकमंत्रिपदावरून सध्या या सरकारमध्ये भानगडी सुरू आहेत. मला हा जिल्हा पाहिजे, तो जिल्हा पाहिजे असे सुरू आहे. हा अजब प्रकार सुरू आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या या सरकारमध्ये भानगडी सुरू आहेत. पालकमंत्री पदासाठी सरकारमधील काही मंत्र्यांचे वादविवाद असल्याचे सांगितले जात आहे. आपल्याला याच जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचे आहे, असा हावरटपणा आणि आचरटपणा काही मंत्री करत आहेत. मात्र, हाच जिल्हा पाहिजे अशी मागणी करण्यामागे रहस्य दडले, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला. पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे, खडसे म्हणाले, जिंकलो किंवा हरलो विधानसभेत पराभव का झाला याचे चिंतन करायला पाहिजे. केंद्र सरकारकडून कापूस खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. लाडकी बहीण सुरू केली आणि आता चौकशी सुरू केली. चौकशीनंतर गुन्हे दाखल होऊ शकतात. विधानसभेत निवडणुकीत आपल्याला अपयश येणे याची अनेक कारण असू शकतात. लाडकी बहीण, पैशाचा वापर गुंडगिरी, काही लोकांना ईव्हीएम मशीनवरही संशय आहे. या सर्व बाबीचे चिंतन करा आणि नवी सुरुवात करा. पुढे एकनाथ खडसे म्हणाले, अपयश आले तरी मी मात्र थांबणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा. आपल्या अपयशापेक्षा हे जाऊ द्या. सरकारलाही असे वाटते की आपण एवढ्या जास्त फरकाने कसे आलो, तेही यातून सावरलेले नाही. काही जणांना असे वाटत आहे की मी अजित दादासोबत जातोय, तर काहींना वाटत आहे की भाजपमध्ये जातो. मात्र या सर्व चर्चा आहेत, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी केले आहे.