होळीच्या पूजेसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने उडवले:शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता ठार, 2 गंभीर; मुंबईतील घटना

मुंबई महामंडळाच्या शिवनेरी बसने बुधवारी मध्यरात्री मुंबईच्या प्रभादेवी भागात होळीच्या पूजेसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना उडवले. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, इतर दोघे गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणय बोडके (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री ते आजच्या होळीच्या पूजेसाठी फुले आणण्यासाठी दुचाकीवरून दादरच्या फुल बाजारात जात होते. प्रणयसोबत त्याचा मित्र करण शिंदे (29) व दुर्वेश गोरडे हे दोघेही होते. हे तिघेही प्रभादेवी भागात आले असता एसटी महामंडळाच्या बसने चुकीच्या दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात हे तिघेही गंभीर झाले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रणयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश व करण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत तरुण शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता दुसरीकडे, पोलिसांनी या अपघाताप्रकरणी एसटी चालक इक्बाल शेख याला अटक केली आहे. अपघातानंतर तो घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नांत होता. पण स्थानिकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत तरुणाच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. प्रणय हा त्याच्या घरातील एकटाच कमावणारा होता. त्याचे कुटुंब काळाचौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटीत वास्तव्यास होते. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विभागात काम करत होता. कुर्ला पश्चिम येथील घटनेची पुनरावृत्ती उल्लेखनीय बाब म्हणजे कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर 1 डिसेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास बेस्ट बसचा एक भीषण अपघात झाला होता. त्यात बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली होती. त्यात 9 जण ठार व 49 जण जखमी झाले होते. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसचा चालक हा बेस्टचा कंत्राटी कर्मचारी होता. सध्या तो अटकेत आहे. आज तिघांना धडक देणारी बसही इलेक्ट्रिकच आहे. त्यामुळे या बस व त्या चालवण्याच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे ही वाचा… औरंगजेबाची कबर नष्ट करा:शिवसेना MP नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी; ASI संरक्षित स्मारक व कबरींची आकडेवारीच केली सादर नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत. वाचा सविस्तर