फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी:महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू, वैष्णवी हगवणे प्रकरणी अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी:महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू, वैष्णवी हगवणे प्रकरणी अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यात कसपटे कुटुंबाने जे काही सहन केले आहे तसेच अजून ज्या कोणत्या बाबी तक्रारीत नमूद करायच्या राहिल्या असतील त्या बाबींचा समावेश करत या केसला अजून कसे मजबूत करता येईल ते बघता येईल. परंतु त्या आधी दोन आरोपी जे फरार आहेत त्यांना तातडीने पोलिसांनी अटक करावी. पुढे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केस स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्यासाठी आणखी काही विटनेस असतील किंवा जे इतर लोक असतील की ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी त्यांच्या बाबी समाविष्ट करायला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा कशी करता येईल या दृष्टीने शासनाच्या आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे. महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू हगवणे यांच्या मोठ्या सुनेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु काही कारवाई केली गेली नाही. यावर अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मोठ्या सुनेने जर महिला आयोगाकडे तक्रार केली असेल आणि आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई केली जाईल. कारण कदाचित तेव्हा 6 महिन्यांपूर्वी दक्षता घेतली असती तर एक जिने तक्रार केली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तिचेही अनुभव समोर आले असते. वैष्णवीचे अनुभव आणि मोठ्या सुनेचे अनुभव जवळपास सारखेच आहेत. परंतु मोठ्या सुनेला नवऱ्याची साथ असल्यामुळे सुदैवाने ती सुखरूप आहे. परंतु तक्रार दाखल करूनही दखल घेतली नसेल तर निश्चितच कारवाई केली जाईल. आम्ही वैष्णवीला न्याय मिळवून देणार अदिती तटकरे म्हणाल्या, शेवटी अशा पद्धतीची घटना घडते हे दुर्दैव आहे. आज सत्तेवर कोणीही असो, नीलम गोऱ्हे ताई उपसभापती पदावर आहेत, त्यांचेही काही अधिकार असतात. आयोगाचे काही अधिकार असतात. त्या संदर्भात कुटुंब म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे हे गरजेचे आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री असतील ते या घटनेतील प्रत्येक अपडेट घेऊन आहेत. तसेच अजित दादा देखील यात लक्ष घालून आहेत. आमच्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की या कुटुंबाला न्याय मिळवून देणे. त्यांनी त्यांची लेक गमावली आहे. आम्ही तिला न्याय मिळवून देणार. पुढे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, ज्या वेळेला शक्ती कायदा तयार करण्यात आला, त्यावेळेला आगल्या बाबींचा समावेश करण्यात आला. केंद्रातले जे काही चांगले बदल करण्यात आले आहेत त्यात पाठपुरावा मुख्यमंत्री करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत. 6 महिन्यांपूर्वी तक्रार केली होती, पण दखल घेतली गेली नसेल तर गंभीर आहे. पण अशा पद्धतीच्या तक्रार महिला आयोग असेल किंवा गृहविभागाकडे आल्या असतील त्या सगळ्या तक्रारींचा आम्ही तपास करू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या समोर सादर करू. पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई होणार वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली तसेच वैष्णवीचे बाळ देखील दोन दिवसानंतर कसपटे कुटुंबीयांना मिळाले आहे. हे बाळ देखील अज्ञात व्यक्तीने आणून दिले. यावर बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, पोलिसांकडून जर काही हलगर्जीपणा झाला असेल त्यांच्यावर मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत ते बारकाईने लक्ष देत आहेत तसेच ज्या काही टीम त्यांनी नेमल्या आहेत, यात कुठेही काही आढळून आले तर कारवाई केली जाईल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment