राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट:ठाण्यात गेल्या तीन दिवसांत 10 रुग्ण आढळले, मुंबईत सर्वाधिक 185 रुग्ण संख्या

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट:ठाण्यात गेल्या तीन दिवसांत 10 रुग्ण आढळले, मुंबईत सर्वाधिक 185 रुग्ण संख्या

पुन्हा एकदा देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सरकारने अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे. तर ठाण्यात गेल्या तीन दिवसात 10 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग आता सतर्क झाले असून विविध रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था केली जात आहे. तसेच गरज पडलीच तर आरोग्य सेवेतही वाढ केली जाणार आहे. मुंबई शहरात मे महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यू आणि इतर व्याधी असलेले आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ठाण्यात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात 10 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचे सौम्य लक्षण असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग किटही आहेत. दरम्यान, राज्यात जानेवारी महिन्यापासून एकूण 6819 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण 185 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment