मयूरी जगतापची दखल घेतली असती तर वैष्णवी जीवंत असती:रूपाली ठोंबरे स्पष्टच बोलल्या, महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण मयूरी हगवणे या थोरल्या सुनेने आधीच हगवणे कुटुंबाची तक्रार आयोगाकडे केली होती. परंतु दाखल घेण्यात आली नव्हती. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट मत मांडले आहे. मयूरी हगवणे (जगताप) यांची दाखल घेतली गेली असती तर आज वैष्णवी जीवंत राहिली असती, असे रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे. महिला आयोगाची चौकशी करावी, त्यात जर आपल्याला दिसून आले की त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरेच वेळ लागलेला आहे. कारण महिलांना न्यायाची खूप अपेक्षा आहे. हगवणे प्रकरणाच्या आधी सुद्धा मला अनेक कॉल यायचे, परंतु आता या प्रकरणानंतर कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहेत, असे रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, मला शिरूर वरून फोन येतो 20 तारखेला की 15 वर्षांच्या मुलीची एफआयआर दाखल झाली आहे, अजून पोलिसांनी काही केले नाही. मला मार्केट यार्डच्या इथून कॉल आला की सोलापूरचा जो नवरा होता त्याने दीड वर्षांचे बाळ तेही पळवून नेले आहे, पोलिसांनी अजून काही केले नाही. म्हणजे एवढे प्रकार वाढत आहेत, त्याच्यावर पोलिस जर सक्षमतेने काम करत नसतील तर नागरिक बोलणार कोणाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकरांनी अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत नागरिक किंवा पीडिता हे सरकारकडे मागणी करणार किंवा ते यंत्रणेकडे मागणी करणार. एखाद्यावर अन्याय झाला तर ते नक्कीच पोलिसांकडे जाणार. पोलिसांच्यानंतर आयोग साक्षमतेने काम करतो म्हणून आयोगाकडे जाणार आणि जर ते काम झाले नाही तर ते तक्रार करणारच, असे रूपाली ठोंबरे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, म्हणून चाकणकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत की ही चिल्लर आहे, हा लेखाजोखा वगैरे. जर खरेच काम केले असेल तर ते काम त्यांनी त्यांची वेगळी आयोगाची प्रेस घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुढे बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, आयोगाची पूर्ण टीम त्यांच्यासोबत असेल. अध्यक्षासोबत अकरा बारा सदस्य असतात. तुम्ही काय काम केले ते दाखवून द्यावे. मी पक्षातली आहे म्हणून पक्षातले कोण चुकले आहे किंवा कोणाची बाजू मी नाही घेणार. जे सत्य आहे, जे खरे आहे कारण हा फार संवेदनशील विषय आहे. हुंडाबळी बंदच झाला पाहिजे. मयूरी हगवणेच्या बाबतीत जर त्या वेळी कडक कारवाई करण्यात आली असती, पोलिसांकडून असो किंवा आयोगाकडून असो, तर वैष्णवी आज आपल्या जगात असती. कारण फॅमिली आहे, जे मयूरीचे जे सासरे आहेत, सासू आहे, तीच वैष्णवीची आहे. मयूरीचे कौतुक केले पाहिजे की तिला मारल्यानंतर ती राजेंद्र हगवणेच्या विरोधात पोलिस चौकीत गेली. वैष्णवी हगवणे नाही गेली. ती रडत वडिलांकडे जायची आणि म्हणायची हे द्या, ते द्या आणि वडीलही ते देत गेले. आज वैष्णवीचा बळी गेला आहे. त्यामुळे मयूरीची दखल घेण्यात आली असती तर वैष्णवी आज जीवंत असती, असे रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट मत मांडले आहे.