स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने जाहीर केलेल्या नाहीत, त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे होत आहेत. सरकारच्या मनात असते, तर या निवडणुका अजून चार वर्षांनीही झाल्या नसत्या, अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने या निवडणुका एकत्र लढण्याचा प्रयत्न सुरू असून, स्थानिक पातळीवर सर्व पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. ही चर्चा नाही, मी स्पष्ट सांगतोय ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. युतीबाबत थेट चर्चा राज ठाकरे यांच्याशीच होईल. उद्धव ठाकरे यांची भूमिका सकारात्मक असून, हा प्रयोग करून पाहावा, असे त्यांचे मत आहे. योग्य वेळी पडदा उघडला जाईल. भुजबळ आता भाजपमध्ये खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळ यांनी मंत्रीपदाबद्दल अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, मात्र अजित पवार यांचे नाव घेतले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे – भुजबळ आता प्रत्यक्ष भाजपमध्येच आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या गटात आहेत. त्यांनी आता अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे. ज्याचे काम शिवसेनेला तोडण्याचे, त्याचे नेतृत्व भुजबळ करतायत, हे दुर्दैव आहे, असेही राऊत म्हणाले. कधीकाळी सीमाप्रश्नासाठी आणि मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरणारे भुजबळ, आज मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याच्या राजकारणात सहभागी झाले आहेत. मोदी-शहांचा मुंबईवर डोळा संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसाचे हृदय आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने ही मुंबई आपली झाली. आता मोदी-शहा-फडणवीस यांचा डोळा या शहरावर आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करत राऊत म्हणाले, भुजबळ आता याच पक्षात आहेत, हे मराठी जनतेने लक्षात ठेवायला हवे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment