महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा:अन्यथा खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणार, रवींद्र चव्हाण यांचा इशारा

महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा:अन्यथा खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणार, रवींद्र चव्हाण यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रोटोकॉल पाळला न गेल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात चांगलेच गाजले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सरन्यायाधीश गवई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही महापालिका आयुक्तांना प्रोटोकॉलचे महत्त्व अधोरेखित करत तशी स्पष्ट आठवण करून दिली आहे. त्यांनी म्हटले की, महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावे. अन्यथा खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई सुरू करण्यासाठी पत्र देणार आहे. या प्रतिक्रियेचे कारण म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असलेला एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम. मात्र, या कार्यक्रमासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा- खासदार रवींद्र चव्हाण हरित क्रांतीचे जनक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नांदेडमध्ये पार पडणार आहे. हा कार्यक्रम नांदेड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कार्यक्रमासाठी मला कोणतेही अधिकृत आमंत्रण मिळालेले नाही. महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. लोकप्रतिनिधींना अशा कार्यक्रमासाठी आमंत्रण देणे प्रोटोकॉलनुसार बंधनकारक असते. खासदार म्हणून मला हक्कभंगासंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार तसेच, त्यांनी महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगत इशारा दिला की, खासदार म्हणून मला हक्कभंगासंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार आहे. मी उद्या यासंदर्भात अधिकृत पत्र देणार आहे. या प्रकरणामुळे नांदेड महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेला तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की अशोक चव्हाण यांच्या घराण्याला मोठे करण्याचे काम कॉंग्रेसने 50 वर्षे केले. कॉंग्रेसने त्यांना मोठी मोठी पदे देण्याचे काम केले. अशोक चव्हाण कॉंग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा कॉंग्रेसच्या जनतेने आणि कॉंग्रेसच्या मंडळींनी वसंतराव चव्हाण यांना लोकसभेला जिंकवून दाखवले. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी मला जिंकवून दाखवले. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा नेता आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व निवडणुका जिंकवून दाखवेल, असा विश्वास आहे. बी.आर. कदम यांच्या राजीनाम्यासंदर्भात रवींद्र चव्हाण म्हणाले, त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही की कुठे जाणार आहे. बी. आर. कदम यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला ते कुठे जाणार हे सांगितलेले नाही. बी. आर. काका यांनी काँग्रेससाठी 40 वर्ष काम केले आहे. ते पक्ष बदलणार आहेत हे तुमच्या माध्यमातून ऐकत आहोत. पक्ष सोडण्याचे कारण त्यांनी सांगावे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment