मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात हवामान विभागाचा रेड अलर्ट:कोल्हापूर, पालघर, नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर आगमन केल्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असून, पूर स्थिती, दरडी कोसळणे आणि वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस) देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट (हलका ते मध्यम पाऊस) देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.