सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा:अजित पवार यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला; दोन्ही NCP एकत्र येण्यावर बोलणे टाळले

सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला आहे. राज्याचे कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा सरपंच अशा शब्दात कोकाटे यांनी कृषी मंत्री पदा बाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावर अजित पवार यांनी आता माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विषयी हे वक्तव्य केले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या वतीने वारंवार वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे. त्यामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहे. याबाबत त्यांनी खुलासा देखील करण्याचा प्रयत्न केला होता. असे असले तरी देखील विरोधकांच्या वतीने यावरून माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता अजित पवार यांना देखील कोकाटे यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे. दोन्ही NCP एकत्र येण्यावर बोलणे टाळले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे. यावर मात्र अजित पवार यांनी बोलणे टाळले आहे. या बाबतच्या प्रश्नावर काहीही न बोलता, अजित पवार हे पत्रकारांच्या समोरून निघून गेले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर आता अजित पवार यांनी काहीही बोलणे टाळले आहे. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनीच चर्चेत राहतात. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना ते म्हणाले की, कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे, ती अजितदादांनी मला दिली आहे.