मी विनंती करतो की वाद चव्हाट्यावर येऊ नये:मुख्यमंत्री गुंता सोडवतील, पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. महायुतीमध्ये सर्व आलबेल राहील याची जबाबदारी भाजपची जास्त आहे. यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहोत, की महायुतीत कुठे ठिणगी पडू नये. पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली असून तो गुंता ते सोडवतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रायगडमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना,कार्यकर्त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की वाद चव्हाट्यावर नेऊ नये. त्यांनी आपापल्या नेत्यांसोबत बसून वाद सोडवावे, जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही. रस्त्यावर वाद न होता आपापल्या नेतृत्वासमोर वाद सोडवले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही 80 जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. 1232 तालुकाध्यक्ष नेमले आहेत. 1 लाख बूथ समित्या नेमल्या आहेत. लवकरच प्रदेशाध्यक्ष संदर्भातला निर्णय होईल. उद्या जरी निवडणुका आल्या तरी भाजप आणि महायुती तयार आहे. तसेच ऑक्टोबर पर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राज्य सरकार निवडणूक आयोगाला त्यासाठी सर्व संसाधन देत आहे. निवडणुका लवकर झाल्या पाहिजे, कारण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. 13000 पदांसाठीची ही निवडणूक असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 13000 नवीन नेतृत्व तयार होईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महसुली प्रशासन आम्ही लोकाभिमुख केलं आहे. येत्या काळात फिरते सेतू पथक तयार करणार आहोत. गावागावात जाऊन विविध दाखले प्रमाणपत्रे लोकांना देऊ. घरपोच लोकांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे संपत्तीचे वाद थांबतील, कोर्ट केसेस थांबतील, पांणद रस्त्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. पुढील दीडशे दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व सेवा ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे. लोकांना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, असे आमचे प्रयत्न आहेत.