राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोडले हात, एकाच वाक्यात दिले उत्तर

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येणार असल्याचे संकेत देखील दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील सूचक विधान केले आहे. या सगळ्यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडत यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमची महायुती मजबुतीने लढणार, मजबुतीने जिंकणार पुण्यात माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न विचारला असता तेव्हा शिंदे यांनी दोन्ही हात जोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आमची महायुती मजबुतीने लढणार, मजबुतीने जिंकणार, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी इतर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार का? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो, महायुती म्हणूनच आम्ही विधानसभा जिंकलो आणि मागील अडीच वर्षांच्या कामाची पावती लोकांनी आम्हाला दिली. नो रीजन, ऑन द स्पॉट डिसीजन दरम्यान, क्रेडाईचा कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभेसाठी एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, मी आज माझी टीम घेऊन आलो आहे, कोणीतरी आता मला म्हणाले की लवकर निर्णय घेणारा मंत्री आहे. ‘नो रीजन, ऑन द स्पॉट डिसीजन’ अशी माझ्या कामाची पद्धत आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी देवेंद्रजी, अजित दादा एकत्र टीम म्हणून काम करतोय, जे थांबलेले कामे होती त्यांना आम्ही चालना दिली आहे. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, कार शेड, अटल सेतू, पुणे मेट्रो यांना चालना देणारे काम केले. यावर लागलेले सगळे स्टे मी काढून टाकले. काम कसे होणार नाही हे सांगायला स्किल लागत नाही, न होणारे काम कसे होईल हे सांगायला लागते, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.