मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही:ऑफर असल्या तरी मी अडचणीच्या काळात पक्षासोबत, वैभव खेडेकरांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. वैभव खेडेकर यांनी आपण राज साहेबांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वैभव खेडेकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे तसेच अविनाश जाधव यांच्याशी चर्चा केल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे नाही वैभव खेडेकर म्हणाले, मी 30 वर्ष साहेबांच्यासोबत पक्ष स्थापनेपासून आहे. मी नाराज वगैरे नव्हतो. माझे जे काही म्हणणे होते ते मी मांडले होते. माझ्या नाराजीची बरीच चर्चा माध्यमांत झाली. इतर पक्षात जाणार वगैरे बातम्या चालल्या. मला दुसऱ्या पक्षांच्या ऑफर असल्या तरीही मी अडचणीच्या काळात पक्षासोबत आहे आणि भविष्यातही राहील. आमचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी मला बोलावून माझे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे नाही. त्यामुळे जे मी बोललो तेच साहेबांसमोर मांडणार आहे. पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही पक्षात नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही. साहेबांशी बोलेन, त्यांच्याशी चर्चा करून समाधान घेऊन मग आपल्याशी बोलेन. मी जे काही मांडले आहे त्यावर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आमच्याकडे खूप काही नाही, जे मला मिळवायचे आहे. जे आहे त्यात सुसूत्रता करून घेणे आमचे काम आहे. माझे पक्षातील काम बंद नाही. आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला त्याबाबत कालच मी प्रशासनाला निवेदन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. काम थांबवायला सांगितले तर थांबवेन पुढे बोलताना वैभव खेडेकर म्हणाले, मी नाराज होऊन घरी बसलो नाही. आजही मी रणांगणात आहे. काम करतोय. माझ्या म्हणण्याची दखल घेतली आहे. म्हणणे मांडणे ही राजकीय प्रक्रिया असते. त्यातून मार्ग नक्कीच निघेल. राजकीय जीवनात चांगले काम करणाऱ्यावर अनेक पक्षांची नजर असते. आम्ही देखील इतर पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यावर नजर ठेवतो, तसेच माझ्या बाबतीत झाले असेल. राजकीय प्रवाहात या गोष्टी घडत असतात परंतु निष्ठा त्या पुढचे पाऊल असते. निष्ठा खूप महत्त्वाची असते. निष्ठा पाहणारे समाजात खूप लोक आहेत. मला काय मिळण्यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हे पाहायचे असते. प्रलोभन आणि निष्ठा यात निष्ठा महत्त्वाची आहे. मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही, मला कुणी काम थांबवायला सांगितले तर थांबवेन.