अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा:बावनकुळे यांचा राहुल गांधींना सल्ला; जनतेने झिडकारल्यानंतर रडगाणे सुरु झाल्याचा आरोप

2009 मध्ये 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? असा प्रश्न उपस्थित करत मतदार वाढीवर प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकड्यांनिशी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडेवारी देत राहुल गांधींचे आरोप खोडून काढले आहेत. राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ “संशयास्पद” आहे. पण राहुलजी 2009 ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत – 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते! तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या. 2004, 2009 ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणे सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुलजी आकड्यांचे अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचे कारण देत आहात, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.