ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही:पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार

मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सूचक विधाने केली जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्या आज तुळजापुरात माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडे आज तुळजापूर दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडेंकडून राज्यभरातील तीर्थक्षेत्रावर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला जात आहे. त्यानुसार त्यांनी आज तुळजापुरात स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पंकजा मुंडे यांना माध्यम प्रतिनिधींनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबई महानगरपालिकेत भाजपला अडचण येईल का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे तर राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला अडचण येईल असे मला वाटत नाही. ते, दोघेही मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. उद्धव ठाकरे म्हणाले -आता बातमीच देतो दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना आम्ही आता संदेश नाही तर थेट बातमी देणार असल्याचा दावा केला होता. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी हे एका वाक्यात सांगितले आहे. याविषयी बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही. थेट बातमी देईल. माझ्या व शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणता संभ्रम नाही. माझ्या मते, संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ, असे ते म्हणाले होते. नीतेश राणेंकडून संभाव्य युतीची खिल्ली दुसरीकडे, भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एकाला 20 आमदार दिले, तर दुसऱ्याला शून्य दिला. बापरे, त्यांच्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही एवढे घाबरलो आहोत की, आम्हाला झोप लागत नाही. भाजपला, आमच्या जिल्हाध्यक्षांना आता आपले कसे होणार हा विचार करून घाम आला आहे. आमच्याकडे 132 आमदार आहेत. आमची त्यांच्याशी कशी तुलना होणार? असे ते उपरोधिकपणे म्हणाले. दरम्यान, नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडले तेव्हाच संपला असा दावाही केला. उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलवारी:कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांचा मोठा दावा; ठाकरे ब्रँड संपला म्हणत राज – उद्धव युतीची खिल्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो, असा दावा करून कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याच प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा अर्थात आदित्य ठाकरे तुरुंगाची हवा खाऊ शकतो, असे ते म्हणालेत. पूर्ण बातमी वाचा…