भाजपने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला:नाना पटोलेंचा गंभीर आरोप, विधानसभा निवडणुकीवर कॉंग्रेस पुन्हा आक्रमक

महायुती तसेच भाजपवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका लेखातून जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला, असा आरोप कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे. मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे नाना पटोले म्हणाले, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले, त्याच रात्री 11.30 वाजता ते 65.02 टक्के तर दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण 7.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल 76 लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे. निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते नंतर यंत्रणा कामाला लागली व निकाल वेगळा लागला हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपच्या मर्जितील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही उघड आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे. लोकशाहीला हा कलंक असून निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली. आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत. भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का. शिर्डी मतदारसंघात 7 हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत. ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपला मिळाले आहे. आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान पटोले यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही तर भारताच्या लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचे सत्य उघड करणारा दस्ताऐवज आहे. लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी वाकवून कपट, फसवणूक करून महाराष्ट्रात जनमताची चोरी करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली आहे.