आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल:पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन

आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल:पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ आजपासून (8 जून) आंदोलनाची जोरदार सुरुवात होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते मोझरी येथील समाधीपर्यंत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत राज्यभरातून तब्बल 20 हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. आंदोलनपूर्वी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. त्यांच्या या विधानामुळे आंदोलनाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. ..म्हणून अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासन मिळाली होती. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. शेतमालांचे भाव पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छीमारांचा, मेंढपाळ यांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही दिव्यांगांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहे. परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाही. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अंत्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्द्यांपासून दूर होणार नाही. ठाकरे बंधू एकत्र झाले तर फार चांगले होईल दरम्यान, राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र झाले तर फार चांगले होईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहे, म्हणून एकत्र येऊ नये, तर मुद्द्यांवर एकत्र आले पाहिजे. मुंबई वाचवणे फार महत्त्वाच आहे. काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळ भाजपने लावले राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबद्दल लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, ईव्हीएम मशीन हे खरे पाहिले तर काँग्रेसचे पाप होते. त्यांनी बी पेरले. काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळ भाजपने लावले आहे. त्याचे हे परिणाम आहे. ईव्हीएम मशीनने लोकशाहीला घाला घातला आहे. खून करण्याचे काम भाजपने केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment