बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही:राज-उद्धव ठाकरे युतीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले- दोन भावांमध्ये किती संवाद आहे माहित नाही

बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकतर येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत, यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील युतीबाबत मातोश्रीवर बैठक झाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते दोन पक्ष आहेत, भाऊ आहेत, काका पुतणे आहेत, त्यांचे त्यांना ठरवायचे आहे. त्यांचे ठरले तर प्रतिक्रिया देऊ. त्यामुळे बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही. दोन भावांमध्ये किती संवाद आहे माहित नाही. मात्र माध्यमांमध्येच जास्त उत्सुकता दिसतेय. मला सध्या यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते की, राज-उद्धव एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. बैठकीत उद्धव ठाकरे युतीसाठी तयार आहेत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. आपण हात पुढे करायला तयार आहोत, ते टाळी देतात का पाहू. या युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर दिली होती. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली आहे. राज व उद्धव यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही केवळ इच्छा व्यक्त करतो. प्रत्यक्ष त्यांनी एकत्र आले पाहिजे. या दोघांसह शिंदे यांनीही एकत्र येऊन एक अखंड शिवसेना तयार करावी, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या विभाजनामुळे शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले. आज दोन्ही बंधू एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहेत. ते ही या युतीत आले पाहिजेत.