अडीच हजार कोटींची विकासाची कामे, 600 कोटींची ड्रेनेज योजना:त्यामुळे मतदारांनी निवडले – संजय शिरसाट

अडीच हजार कोटींची विकासाची कामे, 600 कोटींची ड्रेनेज योजना:त्यामुळे मतदारांनी निवडले – संजय शिरसाट

विकासासाठी छत्रपती संभाजीनगर शहराला आता भगवान भरोसे सोडून चालणार नाही. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणुक ही सुरुवात आहे. एक बजाज कारखाना आला, तर शहराचे चित्र बदलले. आता शेद्रा-बिडकीनमध्ये मोठ्या कंपन्या येत आहेत. त्यामुळे राजकारणी, प्रशासन यांनी शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळात हे बदलेले शहर पहायला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात अडीच हजार कोटींची विकास कामे केली. या भागासाठी ६०० कोटींची ड्रेनेज योजना राबवली. त्यामुळेच मतदारांनी मला पुन्हा निवडून दिले, असेही त्यांनी सांगितले. प्रश्न : मराठवाड्याचे नेतृत्व आपण करता. मागच्या साडेतीन वर्षांत उठाव झाल्यानंतर आता आपण मागे वळून पाहता आता काय वाटते? उत्तर : माझा राजकारणातला इतिहास हा ४२ वर्षांचा आहे. हा प्रवास छोटा नाही. मी राजकारणात यायचा माझा विचार नव्हता. मला ते आवडत नव्हते. १९७६ मध्ये आणीबाणी लागली. ‘अंधेरे एक प्रकाश, जयप्रकाश’ ही घोषणा ऐकत होतो. जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल ऐकले. १९८४ मध्ये मी राजकारणात आलो. आताचा साडेतीन वर्षांतला कालखंड ‘टर्न’ देणारा अथवा आयुष्याची राखरांगोळी करणारा होता. राजकारणात टिकेल की नाही हे सांगता येत नव्हते. एखाद्या आमदाराला त्यांच्या मतदारसंघात निवडून यावेसे वाटते. मात्र, सगळेच येतात का, तर नाही. आता एका गोष्टीचा आनंद आहे की, ज्या भूमिकेतून बाहेर पडलो तीच भूमिका कायम ठेवली. मी खुलेआमपणे बोलतो. मी जाणून बुजून वैयक्तिक पातळीवर इतर लोक जशी टिका करतात, ज्यांना टिका करणे म्हणजे शिव्या देणे वाटते, तसे मी करत नाही. बेसिक आणि सडेतोड उत्तर हा माझा स्वभाव आहे. या साडेतीन वर्षांत लोकांना मला आणखी ओळखता आले हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड केले.अजित पवार निधी देत नाहीत, ही तक्रार होती. पुन्हा आता तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा कोंडी होत आहे…? उत्तर : काही अँडजेसमेंट केल्या आहेत. त्या भाजपने केल्या आहेत. त्या आजही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील रुचत नाहीत. मात्र, पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेली ती युती आहे. आता तो त्यांचा अधिकार आहे. एकत्रित काम करावे लागेल, याची आता त्यांना जाणीव झाली आहे. त्याच्या भूमिका वेगळ्या आमच्या वेगळ्या आता त्यांच्यावरचा रोष नाही. अजित दादा देखील ‘साॅफ्ट’ झाले आहेत. प्रश्न : मग बजेटला कात्री का लागली आहे. सामाजिक न्याय विभागाचे बजेट कमी का झाले आहे? उत्तर : बजेटला कात्री लागणे म्हणजे मुळात खात्याचे पैसे वळवता येत नाही. कात्री लागली म्हणजे सगळे पैसे गेलेत का? ‘लाडकी बहिणी’साठी पैसे वळवले म्हणून मी नाराज आहे, असे चित्र निर्माण केले आहे. मात्र, येणाऱ्या अधिवेशनात पुरवण्या मागण्यात मला तरतूद होईल, अशी आशा आहे. मुळात माझ्या खात्यात कुठेही कट लावता येत नाही. माझ्या बोलण्यावर मी आजही ठाम आहे. प्रश्न : एक लाख कोटीची गुंतवणूक शहरात होत आहे. नव्याने उद्योग वाढत आहेत, याबाबत आपण काय सांगाल? उत्तर : भविष्यातल्या येणाऱ्या उद्योगासाठी संभाजीनगरने तयार झाले पाहिजे. जागा नसल्यामुळे पुण्यापेक्षा आगामी काळात आपल्या भागात आधिक उद्योग येतील. बीड, परभणी, लातूरकडे उद्योग जायला तयार नाही. त्यामुळे एक लाख कोटीची गुंतवणुक ही तर सुरुवात आहे. राजकारण बाजुला ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुक झाल्यामुळे विकास होईल. अडीच लाख लोकसंख्या इथे वाढणार आहे. कामगार लेबर हॉस्पिटल शाळा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे जमिनीचे दर देखील वाढणार आहेत. आता आपले शहर बिडकीनपर्यंत वाढणार आहे. आता नेत्यांनी संयम राखून शहराचा विकास कसा केला पाहिजे. एक बजाजचा कारखाना आला की विकास झाला होता. आता हे चित्र आणखी बदलणार आहे. प्रश्न : स्थानिक पालकमंत्री पूर्वी नव्हते. आता सलग तीन पालकमंत्री स्थानिक झाले. मात्र, नेमके काय झाले, कुठे अडचण आहे? उत्तर : तीन पालक-मंत्र्यांपैकी पहिल्या पालकमंत्र्यांच्या काळात गुंतवणूक आल्याचे पहायला मिळाले. दुसऱ्या पालकमंत्र्यांचा काळ कमी होता. तर मी गेल्या चार महिन्यांत पालकमंत्री असताना मूलभूत गरजा काय आणि काय झाले पाहिजे, हे आम्ही प्रत्येक विचारात घेतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतो. आता त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. कधी काळी आपल्या शहरात नियोजन केलेच नाही. भगवान भरोसे विकास चालू आहे. पाइप लाइन फुटली, त्याची ‘लाइफ’ कधी बघितली का? कोणीच पाहिली नाही. शहरातील पुढारी आणि प्रशासन जबाबदार आहे. ४० टक्के पाण्याची चोरी होते. अनेक ठिकाणी नाली भरून पाणी वाहते. कर भरतात त्यांच्याकडे ओरड सुरू झाली आहे. दुसरे म्हणजे राजकीय लोकांनी दिलेला अतिक्रमणाचा सपोर्ट. त्यामुळे आम्ही केवळ मतदार बघतो, त्याला दिलेला सपोर्ट मधून सर्वत्र अतिक्रमणे वाढली. त्याचे लोण हळुहळू पसरले. त्यामुळे गुलमंडी वरून चालू शकत नाही. मोंढ्यात चालू शकत नाही. आता त्यांना सांगितले की श्वास मोकळा करा. हे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले. मनपा आयुक्तांना सांगितले की तुम्हाला अडथळा येणार नाही. तुमचे काम प्रामाणीकपणे करा. कोणी विचारणार नाही. नागरिक आता त्याला सपोर्ट करत आहेत. प्रश्न : सत्ता आपली, प्रशासन आपले. तारखा सांगितल्या जातात, पण पाणी मिळत नाही. नेमकी तारीख काय? कधी मिळणार पाणी? उत्तर : खरे सांगायचे तर आम्ही सर्व प्रशासनाच्या भरोशावर सोडले होते. ते सांगायचे आम्ही ऐकायचो. जेव्हा १५ दिवसानंतर पाणी येऊ लागले मी तेव्हा जलवाहिनीचे काम पाहण्यास गेलो. जीवन प्राधिकरणाने काय काम केले पाहिले. जगात कोणी इतके बोगस काम केले नसेल ते त्यांनी केले. १०० ते १५० मीटर अंतरावर ४ ठिकाणी जोड दिल्याचे सांगितले जात आहे. मग इतक्या प्रेशरने पाणी येणार, तर पाइप फुटणारच. जलवाहिनीच्या वाटेत एक खांब समोर आहे. तो हटवला नाही. तो खांब काढून टाकायला सांगितले. प्रश्न : मग लक्ष घालायला उशीर झाला का? उत्तर : मी प्रत्येक वेळी पाणी योजनेचे काम पाहण्यास गेलो असतो, तर लोकांनी आरोप करायला कमी केले नसते. त्यामुळे आम्ही प्रशासनावर सोडले होते. आता मी गेलो त्यामध्ये सुधारणा झाली आहे. आता रात्रीचे नऊ वाजले तरी काम सुरू आहे. पाणी कधी येणार याची तारीख आताच सांगणार नाही. प्रश्न : नवीन उद्योग येणार आहेत. त्यासोबत अनेक सुविधा पायाभूत सुविधा, रिक्रेयशन सेंटर, शाळा लागणार आहे. याबाबत आपले व्हिजन काय? उत्तर : ‘डीएमआयसी’मध्ये सर्व व्यवस्था केल्या आहेत. कामगारांसाठी व्यवस्था आहे. त्याचे नियोजन केले आहे. या शहरात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने परदेशी कंपन्या येत आहेत. मात्र गोल्फ मैदान नसले की कंपन्या प्रकल्प देखील सुरू करत नाहीत. हे सर्वांची निर्मिती होणे गरजेचे आहे. तुम्ही म्हणाल, पाणी नाही गोल्फ काय करायचे. ते चालणार नाही. टोयटोच्या ५०० अधिकाऱ्यांना प्लाॅट, फ्लॅट पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेगाने जावे लागणार आहे. त्यासाठीच्या सुविधा आम्ही करत आहोत. आता आपण २१ मजल्याच्या इमारती होत आहेत. आपण सुविधा देत आहोत. प्रश्न : राज्य सरकार म्हणून शहराच्या विकासासाठी काय सपोर्ट करत आहे. मराठवाड्यात विकासाची खूप गरज आहे. राज्य शासन किती लक्ष देत आहे? उत्तर : गेल्या अडीच वर्षाचा कालावधी बघा. हे शहर एक खेडे म्हणून ओळखले जात होते. मात्र, चांगले रस्ते करून आपण यामध्ये सुधारणा केली. त्यामुळे आपला एक डाग मिटवला गेला आहे. मी निवडून कसा आलो. त्याच्या मागचे कारण मी केलेली कामे. आमच्याकडे रस्ते केले, ड्रेनेज केले. लोकांच्या किमान गरजा पाहिल्या. सातारा देवळाईसाठी ६०० कोटींचा ड्रेनेज प्रकल्प आणला. अडीच ते तीन हजार कोटी माझ्या मतदारसंघात खर्च केले. चांगले रस्ते आहेत. पाच वर्षांपूर्वी चिखलाचे रस्तो होते. काही क्रेडिट आम्हाला देखील द्या. अतुल सावे, प्रदीप जैस्वाल सर्वांच्या मतदारसंघात काम झाले आहे. तिन्ही लोकप्रतिनिधींवर कोणावरही डाग नाही. वसुली नाही. बाकी भानगडी नाही. एक विचाराने काम करतो. पुढच्या आठवड्यात नगर नाका ते दौलताबाद चौपदरी सिमेंट रोड आम्ही सुरू करणार. त्यामुळे या भागातील अपघाताच्या बातम्या येणार नाहीत. प्रश्न : पर्यटनाबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. बीबी का मकबरा, वेरूळ, अजिंठा लेण्या, तसेच प्राधिकरण याबाबत प्रगती दिसत नाही…? उत्तर : आता बीबी का मकबरा परिसरातील रस्ता तयार होत आहे. वेरूळ येथे गढी परिसरातील अतिक्रमण काढले जात आहे. त्याच्यासाठी निधी मिळत आहे. ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे काम सुरू आहे. ‘डीपीसी’मधून निधी देत आहे. अजिंठा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. मात्र, रस्ता झाल्यास कमी वेळेत पर्यटकांना पोहोचता येणार आहे. प्रश्न : अचानक पालकमंत्री नाराज का होतात? उत्तर : मला काही गोष्टी आवडल्या नाही तर मी नाराज होतो. मला मी किती दिवस राहील याची काही चिंता नसते. मी नाराज झालो त्याचे कारण वेगळे असते. चांगल्या काम करणाऱ्यांना पाठीशी देखील राहतो. आपल्या नावावर कोणी गडबड केली तर मग त्याची चिंता मी करत नाही. मी बोलतो त्याची सगळे जण वाहवा करतात. प्रश्न : शहरात मोठे नेते आल्यानंतर तुमच्यावर टिका करतात. तुमच्या घरावरून चर्चा होते. असे का? तुमच्याशिवाय राजकारणाची आता चर्चा होत नाही…? उत्तर : ही संकुचित विचारसरणी ज्याची आहे, तो असा विचार करतो. अंबानीच्या घरी किती पैसे आहेत ते कोणी विचारतो का? त्याच्या मुलाच्या लग्नात किती पैसे खर्च झाला कोणी विचारले का? तेथे तर लोक नाचायला जातात. त्यांना कोणी विचारत नाही. आपल्यातल्या माणसाची चर्चा करतो. मला माझ्याबद्दल तक्रार करणारा एक माणूस दाखवा. ‘शिरसाटने मला फसवले,’ असे कोणी सांगितले तर मी राजकारण सोडून देईन. माणसाला स्वत:ची स्वप्ने असावीत. स्वप्न घेऊन जगले पाहिजे. माझे घर टापटीप असावे मलाही वाटते. ७२व्या मजल्यावर फ्लॅट घेतला म्हणजे मुंबईत माझ्या एकट्याचाच आहे का? माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांचेही आहेत. मात्र, मी कधी त्याची चर्चा करत नाहीत. काही जण चर्चा करतात. ‘संजय शिरसाटचा बंगला पहा’, म्हणतात. तुमच्या घराबाबत मी सांगू का…? सतत माझ्या घराबाबत बोलतात मी काढतो का तुमच्याबद्दल…? माझ्या घरात माझीच बायको राहतो. माझ्या घरावर आता काही कपडा टाकू का. घर ही काही लपवायची गोष्ट आहे का. ७२व्या मजल्याची चर्चा करणारे बिनडोक लोक आहेत. तुम्हाला आपले लोक मोठे होऊ नये असे वाटते का? माझाही संसार आहे. मलाही माझ्या मुलांनी माझ्यानंतर रस्त्यावर येऊ नये, असे वाटते. मी काही स्वर्गात घेऊन जाणार नाही. जे आहे ते चांगले असावे ही माझी भावना आहे. मला चांगले रहावे, असे वाटते. चांगल्या गोष्टी सोबत असाव्यात, असे वाटते. मी असे पुढारी पाहिले आहेत, ज्यांच्याकडे इतके पैसे आहेत, ते मोजायला महिना नाही तर वर्ष लागेल. त्यामुळे अशा लोकांची मला दया येते. राजकारणात अपयशी ठरलेले लोक याची चर्चा करतात. रॅपिड फायर… प्रश्न : मनपा समोर आव्हान कोणाचे? भाजप, एमआयएम की उद्धव सेना उत्तर : एमआयएम आणि उद्धव सेना प्रश्न : संजय शिरसाट बजेटला कात्री लावल्यामुळे नाराज आहे का? उत्तर : हो, नाराज आहे. प्रश्न : तुमच्या कडक स्वभावाचा तुम्हाला फायदा झाला की तोटा? उत्तर : तोटा जास्त झाला, फायदा थोडा झाला. प्रश्न : तुमचा वारसा कोण पुढे नेणार? मुलगा, मुली की कार्यकर्ते? उत्तर : कार्यकर्ते माझा वारसा चालवणार.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment