कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य:ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का? पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलटप्रश्न

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वारंवार वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. यातच आता अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना डिवचणारे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर शेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. केवळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील. काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत. शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी कोकाटे यांनी पिक विमा योजनेबद्दल बोलताना म्हटले होते की, “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो.” या विधानामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि त्यांनी कोकाटे यांच्यावर टीका केली होती. कर्जमाफीच्या निधीचा गैरवापर
कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हटले होते की, “कर्जमाफीचा पैसा शेतीसाठी न वापरता साखरपुडे आणि लग्नासाठी वापरला जातो.” या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती. कांद्याच्या उत्पादनावरून शेतकऱ्यांना दोष नाशिक दौऱ्यावर असताना, कोकाटे यांनी कांद्याच्या बाजार भावावरून शेतकऱ्यांना दोष दिला होता. ते म्हणाले होते की, “एका शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला की, सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतात, त्यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतात.” या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. माफी आणि स्पष्टीकरण या वादग्रस्त विधानांनंतर, कोकाटे यांनी जाहीरपणे माफी मागितली आणि स्पष्ट केले की, “कधी कधी बोलताना चूक होते, पण माझ्या हेतू चुकीचे नव्हते.” या घटनांमुळे कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला आहे. शेतकरी संघटनांनी त्यांच्या विधानांचा निषेध केला आहे.