सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले?:संजय राऊतांचा प्रश्न; मोदींमुळे भारताला एकही मित्र राहिला नसल्याचा दावा

जगामध्ये भारताला एकही मित्र राहिलेला नाही. जगात भारताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाऊन गाणी म्हणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारताच्या बाजूने जगातील एकही देश उभा राहण्यास तयार नाही. याला केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची फसलेली विदेशी निती जबाबदार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शेजारील देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने उभा राहण्यास तयार नाही. विदेश नीतीचे हे अपयश आणि नरेंद्र मोदी यांची पूर्णपणे बिघडलेली प्रतिमा यासाठी कारणीभूत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जगामध्ये भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीही उभी राहिले नाही. भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला जगात एकही मित्र नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? ते परदेशात जाऊन गाणी म्हणत आहेत. आणि कोणत्या ते कोणत्या कामासाठी कोणत्या देशात गेले? यावरूनही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. खासदारांचे शिष्टमंडळ ज्या देशांमध्ये गेले आहेत, त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या देशांचा आणि भारत – पाकिस्तान संघर्षाचा काहीही संबंध नाही. अशा देशात देखील शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यांना विश्व-गुरूंनी पाठवलेले असल्यामुळे त्यांना जावे लागले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. भारताची पाणी थांबवण्याची चीनची धमकी ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण बांधून भारताचे पाणी थांबवणार असल्याची धमकी चीनच्या वतीने देण्यात येत आहे. मात्र, हा प्रश्न पत्रकारांनी विश्वगुरू नरेंद्र मोदी, अमित शहा, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री यांना विचारायला हवा. आम्ही सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न आम्हाला नक्की विचारा. या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गिरीश महाजन यांना देखील हा प्रश्न विचारू शकता, अशा शब्दात संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवण्याची वेळ काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा भाजपवाले करत होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळातच काँग्रेस जास्त वाढली. त्यांच्यावर काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवण्याची आणि भारताची बाजू मांडण्याची वेळ भाजपवर आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.