अंबरनाथमध्ये प्रेमी युगुलाने संपवले आयुष्य:गळफास घेत केली आत्महत्या, परिसरात एकच खळबळ

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळ एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या मृतदेहांच्या अवस्थेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी आत्महत्या केलेले दोघेही प्रेमसंबंधात होते, अशी माहिती दिली आहे. मृत प्रेमी युगुलाची नावे मनीषा पाटील आणि विवेक पाटील अशी असून, त्यांनी प्रेमसंबंधातूनच आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोघेही कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहत होते. सध्या हिललाईन पोलिस आत्महत्येचे नेमके कारण शोधत असून, तपास सुरु आहे. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा आत्महत्यांच्या घटना वाढत असून, त्यामागे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक कारणे असल्याचे निरीक्षण केले जात आहे. या घटनांनी पुन्हा एकदा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.