अमित ठाकरे गोड मुलगा, त्याच्या भूमिकेचे काका म्हणून स्वागत:राज-उद्धव ठाकरेंच्या युती बाबत संजय राऊत यांचा प्रतीक्षा करण्याचा सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या युती बाबत नेते सकारात्मक असल्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे काय म्हणताय, त्यापेक्षा या दोघांच्या जन्माच्या आधीपासून ते भाऊ आहेत. त्यामुळे कोण कधी कोणाला फोन करतो? याबाबत बोलण्यापेक्षा थोडी प्रतीक्षा करा, तुम्हाला फळ दिसेल, असा सल्ला देखील राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती विषयी चर्चा करायची असेल, तर त्यांनी एकमेकांना फोन करावा, असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे हा गोड मुलगा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याला पाहतोय. त्याचा काका म्हणून त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल. मी दहा मिनिटांनी फोन करतो, हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही. त्या दोघांमध्ये फोनवर बोलणेही झाले असेल? तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. काही दिवसात झाडाला फळे देखील येतील. त्यामुळे एवढ्या लवकर फळे कशी आली? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतात, असे देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. आमच्यासाठी ते दुसरे घर राज ठाकरे यांना संजय राऊत यांनी त्यांचे पुस्तक भेट म्हणून पाठवले होते. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मी राज ठाकरे यांच्या घरी देखील जाईल. आमच्यासाठी तो कॅफे नाही तर आमच्यासाठी तर दुसरे घर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला असेल, तर याची तुम्हाला काय माहिती? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्राचे शत्रू नाहीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडण्याची अट उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज ठाकरे यांना घालण्यात आली होती. यावरुन मनसे नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडणार का? असा प्रश्न ठाकरे गटाला विचारला होता. यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्राचे शत्रू नाहीत. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी घाव घातले आहेत. तसे घाव काँग्रेस, राष्ट्रवादीने घातलेले आम्हाला दिसले नाहीत. हे राज ठाकरे यांना देखील मान्य असेल. त्यामुळे भविष्यात एका टेबलावर चर्चा होऊ शकते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारची गाडी खिळखिळी राज्य सरकारची गाडी खिळखिळी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर गाडी चालवली असेल तर गाडीचा अपघात करुन मी कशी उडी मारून पुढे जाईल, असा विचार त्यांच्या मनात असेल. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मी गाडी ताब्यात कशी घेईल, याचा विचार सुरु असेल. तर दोघेही बाहेर पडल्यानंतर सीट वरती उडू मारून मी ड्रायव्हिंग सीट कसे ताब्यात घेईल, असे पाठीमागे बसलेला नेता म्हणजे अजित पवार यांच्या मनात सुरु असेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुती वर निशाणा साधला आहे.