अपेंडिक्स शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची त्वचा भाजली:वाशीम जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना, नातेवाईकांची पोलिसांत तक्रार

राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना वाशीम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्हा रुग्णालयात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडून गेल्यानंतरही डॉक्टरांकडून नातेवाईकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील अताऊल्ला खान यांना पोटदुखीच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली होती. सोनोग्राफीत त्यांना अपेंडिक्सच्या त्रासाचे निदान झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 19 मे रोजी त्यांच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दोन दिवसांनंतर जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सदरील घटनेबाबत कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांनी ही बाब हलक्यात घेतली. तसेच ही घटना “तांत्रिक बिघाडामुळे अनावधानाने घडली” असल्याचे सांगितले. मात्र ही चूक एवढी गंभीर असताना नातेवाईकांना वेळेवर माहिती न देणे, ही गंभीर दुर्लक्षाची बाब असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कुटुंबीयांची पोलिसांत धाव रुग्णलयातील डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे अताऊल्ला खान यांचे नातेवाईक संतप्त असून त्यांनी वाशीम पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या संदर्भात डॉक्टरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी या सगळ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. तसेच आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील तांत्रिक उपकरणांची स्थिती, डॉक्टरांचा प्रशिक्षण दर्जा, शस्त्रक्रियेदरम्यान घेतली जाणारी काळजी आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आधीच अपुरे मनुष्यबळ, जुनी उपकरणे आणि व्यवस्थेतील कमकुवत दुवे यामुळे शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.