अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय:पुढचे 36 तास महत्त्वाचे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय:पुढचे 36 तास महत्त्वाचे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या चार दिवसांपासून विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते उत्तरेकडे सरकत असल्यामुळे पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे जे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. अशात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग 35-40 किमी तर काही ठिकाणी तो वेग 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा अरबी समुद्रातील खवळलेले वातावरण लक्षात घेता, हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील मच्छिमारांना पुढील 2 ते 4 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. समुद्रात उंच लाटा आणि जोरदार वारे असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून प्रवेशाच्या तयारीत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये नैर्ऋत्य मोसमी पावसाचा केरळमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात सध्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे अनुकूल वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे केरळसह कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुढील चार दिवसांचे अलर्ट काय? संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरीत आज रेड अलर्ट असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उद्या (23 मे) रोजी रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट असून पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई सिंधूदुर्ग, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट आहे. शनिवार आणि रविवारी कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment