अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे:चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही, गिरीश महाजन हगवणेंच्या वकिलावर संतापले

‘अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे. हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. हगवणे यांच्या वकिलाने बुधवारी केलेल्या युक्तिवादावर तसेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या विधानांवर ही संतप्त प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा विषय आहे आणि अशा पद्धतीने वकिलांनी बोलावे, तिच्या चारित्र्यावर आरोप करावे, यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. काय करावे याला कायद्याच्या चौकटी आहेत आणि मंत्री म्हणून मी बोलू शकत नाही. पण अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, सर्व पुरावे असताना अशा पद्धतीने बचावासाठी अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हणावे लागेल. हे स्टेटमेंट करणाऱ्या वकिलाला देखील थोडीफार लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये आई, बहीण, मुली असतील, असे म्हणत गिरीश महाजन यांनी हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले होते हगवणेंचे वकील विपुल दुशिंग? हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले आहेत. ते म्हणाले, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असे त्यांनी कोर्टासमोर म्हटले. तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचे औषध घेतले होते. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वैष्णवी हगवणे प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल झालेल्या सुनावणीत या तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आजच्या झालेल्या सुनावणीत या तिघांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वी दोनवेळा पोलिस कोठडी मागितली होती. पोलिसांना आता आरोपींकडे जी चौकशी करायची होती ती पूर्ण झाली आहे. गरज पडली तर पोलिस या आरोपींची पोलिस कोठडी मागू शकतात. मात्र, आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तिघांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येणार आहे.