“अवकाळी’चा कहर; शहरात 7 जागी वृक्ष उन्मळले:राहुरीत वीज पडून 1 ठार, पाथर्डीत पाखरे दगावली, मागील 18 दिवसांमध्ये 45.2 मिलिमीटर पावसाची नोंद

अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात कहर केला आहे. मागील १८ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत होता. परंतु रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी दुपारी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे पाथर्डी, श्रीगोंदे, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, राहता या भागात मोठे नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी राहुरी तालुक्यातील रामपूर-कोल्हार भागातील लक्ष्मीवाडी येथे वीज कोसळून राहूल पठारे (३७) या युवकाचा मृत्यू झाला. तर पाथर्डीत एक म्हैस व वृक्षांवर बसलेल्या चिमण्यांवर वीज कोसळली व जामखेडमध्येही एक बैल दगावला. शहरात तर सात ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अवकाळी पावसामुळे शिर्डी व राहता परिसरात मोठा फटका बसला. दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे हाल झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी मध्यम तर काही भागात विजेच्या कडकडट्यासह पाऊस झाला. यंदा अवकाळीचे दिवस वाढले असून, पुढचे काही दिवस देखील पावसाचे राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मागील १८ दिवसांपासून ते आतापर्यंत ४५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात २० ते २२ मे दरम्यान विजेच्या कडकट्यासह वादळी वारा, अतिवृष्टीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. २३ मे रोजी वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. ३२ दिवसांत तापमान १० अंशांनी तापमान घसरले : एप्रिलच्या पहिल्या २० दिवसांपर्यंत शहराचे तापमान तब्बल ४३ अंशावर गेले होते. विशेष म्हणजे तीन वर्षानंतर हे तापमान ४३ अंशावर गेले होते.मात्र ५ मे पासून अवकाळी पाऊस सुरु झाल्याने तापमानात घट होऊ लागली होती. सोमवारी शहराचे तापमान ३३. ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. ३२ दिवसांत हे तापमान १० अंशांनी कमी झाले. पेरणीपूर्वी मशागती लांबणीवर, खरीपाचे क्षेत्र वाढणार : २० मेपासून ग्रामीण भागात खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात होत असते. यंदा मात्र ५ मे पासून अवकाळी पाऊस सुरु झाल्याने या मशागती लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, खरीपामुळे शेतकरी कृषी केंद्रांवर खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. प्रतिनिधी | शिर्डी सोमवारी शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच हवामानात बदल जाणवू लागला होता. दुपारी दोन वाजता सुमारे एक तास मुसळधार पाऊस कोसळला. यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा एकदा तासभर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ झाली. शिर्डीतील विठ्ठलवाडी भागात असलेल्या म्हसोबा महाराज मंदिरावर वीज कोसळली. सुदैवाने जिवितहानी टळली. वादळी पावसामुळे राहाता, साकुरी भागात झाडी व विजेचे खांब उन्मळून पडले असून कांदा, आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, राहाता आणि साकुरी परिसरात देखील एक तास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्याच्या झंझावातात २० वीजेचे खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच ११ विद्युत रोहित्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, सध्या सुट्या सुरू असल्याने देशभरातून साईभक्त शिर्डीमध्ये दर्शनाला ेयेत आहेत. अशातच अवकाळी पाऊस झाल्याने मंदिर परिसर व शहरातील विविध भागात साईभक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. वीज कोसळल्याने निवडुंगे भागात चिमण्या दगावल्या. पाथर्डी : शेवगाव रस्ता खचल्याने दुचाकी यात अडकली. नागरिक तातडीने दुचाकीस्वाराच्या मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. बोल्हेगावात वाहतुकीला अडथळा, उपनगरात वृक्ष पडल्याने नुकसान सोमवारी शहरात कोठी रोडवरील झोपडपट्टी परिसरातील घरात व घराबाहेर पावसाचे पाणी शिरले. बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उपाययोजना केल्या. तसेच, कोठी रोडवरील झोपडपट्टी परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. काही घरात किरकोळ पाणी शिरले होते. तसेच, सोना नगर चौक, डॉन बॉस्को जवळ, सावेडी जॉगिंग ट्रॅक जवळ, अष्टविनायक कॉलनी, बोल्हेगाव व परिसरातील प्रेमभारती नगर (जय भवानी चौकाजवळ) येथे झाडे उन्मळून पडली. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शंकर मिसाळ, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी घटनास्थळी जाऊन व कर्मचारी पाठवून झाडे हटवून रस्ते मोकळे करून दिले.