बालभारतीची 11.5 लाख पुस्तके तालुका स्तरावर पोहोच:उर्वरित 12.36 लाख पुस्तके 30 मेपर्यंत येणार, शाळा स्तरावर पुस्तके पोहचवण्याची प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सुमारे ४.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्युपुस्तके दिली जाणार आहेत. शाळास्तरावर पुस्तके पोहोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सुमारे २३ लाख ८५ हजार पुस्तकांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीकडे नोंदवण्यात आली होती. त्यापैकी ११ लाख ५ हजार पुस्तके तालुका स्तरावरील बूक डेपोत पोहोच झाली आहेत. तेथून थेट शाळांपर्यंत पुस्तके पाठवून १६ जूनला पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. शाळेची पहिली घंटा महिनाभरात वाजणार आहे, तत्पूर्वी शाळांमध्ये तयारीला गती आली आहे. शाळा परिसर स्वच्छता, गणवेशाचे नियोजन आखण्यात आले आहे. यंदा शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरच गणवेश खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याने यंदा बहुतांश शाळेत पहिल्या आठवड्यातच विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर गणवेशही मिळणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्युपस्तके दिली जातात. पुस्तकांच्या वजनाच्या प्रमाणात वाहतूक खर्च दिला जाणार आहे. प्रतिकिलो सुमारे दीड रुपये खर्च अपेक्षीत आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४७ हजार ७४८ आहे, त्यांना सुमारे ४.९५ कोटींची १२ लाख ८२ पुस्तके पोहोच केली जाणार आहेत. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या १.५८ लाख असून, त्यांना ११ लाख ३ हजार ७७७ पुस्तके दिली जाणार आहेत. या पुस्तकांची किंमत ३.९९ कोटी आहे. या पुस्तकांचे वजन सुमारे ५.६२ लाख किलो आहे. एका विद्यार्थ्यांच्या पुस्तक संचाची किंमत सुमारे २५० रुपये, तर सहावी ते आठवीच्या एका पुस्तक संचाची किंमत सुमारे ४०० रुपये आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव प्रतीक्षेत तालुकानिहाय पुस्तके पोहोच होण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत नगर १३९,६४१, नेवासे- ३६५५३, पाथर्डी १०४४८५, पारनेर ११४६५२, राहुरी ८४५४४, कर्जत १००७१८, जामखेड ९२४९२, श्रीरामपूर ९३४६७, श्रीगोंदे १०८७७१, शेवगाव ९६६७१, राहाता ८३२५१ पुस्तके पोहोच झाली आहेत. संगमनेर, कोपरगाव व अकोल्यास पुस्तकांची प्रतीक्षा आहे.