बारामती व दौंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा कहर:नीरा डावा कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती, बचाव पथक दाखल

बारामती व दौंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा कहर:नीरा डावा कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती, बचाव पथक दाखल

बारामती आणि दौंड परिसरात रविवारी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कालवा फुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आले, त्यामुळे काटेवाडी-भवानीनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे बारामतीतील सुमारे दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथकं तातडीने मदतीसाठी या भागात दाखल झाली आहेत. बारामती तालुक्यातील पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. अतिवृष्टी झाल्याने काटेवाडी परिसरात 7 आणि बारामती शहरातील 1 असे नागरिक पावसाच्या पाण्यामुळे अडकले होते. या 8 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी एकूण 22.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इंदापूर आणि बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी घुसण्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाकडून मदत आणि पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा डावा कालवा पिंपळी गावाजवळ फुटला. कालवा फुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी पालखी महामार्गावर आल्याने काटेवाडी-भवानीनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे आसपासच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दौंड परिसरातही पावसाचा जोर कायम असून पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे एक इनोव्हा कार वाहून गेली, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बारामतीतील पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून मदतकार्य सुरू आहे. नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौरा करणार बारामती आणि इंदापूर परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार लवकरच बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाला पूर्ण सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, गरज भासल्यास तत्काळ मदत पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे. सुप्रिया सुळेंचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन बारामतीसह पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेली तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही ठिकाणी रस्त्यांवर देखील पाणी आले आहे. माझे नागरीकांना आवाहन आहे की कृपया पुढचे काही दिवस आपण काळजी घ्यावी. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. याखेरीज जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए आणि महापालिका आयुक्त यांनाही विनंती आहे की कृपया आपण सततच्या जोरदार पावसाची नोंद घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय कराव्या. यासह जेथे पावसाने नुकसान झाले आहे तेथे मदत पोहोचविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment