बीडच्या देशमुख कुटुंबाने घेतली वैष्णवीच्या कुटुंबाची भेट:धनंजय देशमुखांनी केली आई-वडिलांशी चर्चा, न्यायासाठी सर्व एकत्र

बीडच्या देशमुख कुटुंबाने घेतली वैष्णवीच्या कुटुंबाची भेट:धनंजय देशमुखांनी केली आई-वडिलांशी चर्चा, न्यायासाठी सर्व एकत्र

पुण्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही हुंडा पद्धती आणि त्यातून हुंडाबळीच्या घटना घडताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी झालेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल झाला असून अटक देखील करण्यात आली आहे. आता बीडच्या धनंजय देशमुख यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची म्हणजे कसपटे कुटुंबाची भेट घेतली आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भरपावसात बीडहून पुण्यातील अनिल कसपटे यांच्या घरी भेटीसाठी आले. हुंडाबळीच्या प्रकरणात सासरच्यांच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे हिच्या माहेरी, कसपटे कुटुंबीयांना सांत्वना देण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. यावेळी धनंजय देशमुख यांनी अनिल कसपटे यांच्याशी या दुःखद घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यभरात जोरदार पावसाचा जोर असून पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा हवामानातही देशमुख कुटुंबीयांनी वैष्णवीच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान धनंजय देशमुख, वैभवी देशमुख, राजश्री देशमुख आणि संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुख हेही उपस्थित होते. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी, आरोपी वाल्मिक कराडसह 7 जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. आपल्या भावाला न्याय मिळावा, वडिलांना न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विविध जिल्ह्यात जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे आपले गाऱ्हाणे मांडले होते. आता वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील पुण्यात जाऊन कसपटे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी महिला आयोगावर देखील टीका केली. राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या 9 महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment