भाजपला मुंबईचा इतका द्वेष का?:आदित्य ठाकरे संतापले; हिंद माता परिसरात पाणी साचणे ‘वेदनादायक’ म्हणत मनपाला धरले जबाबदार

गेल्या दोन ते तीन दिवसाच्या पावसामुळे मुंबई आणि परिसरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई मनपाला जबाबदार धरले आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून भाजपवर टीका केली. ज्या भागाला आम्ही पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, त्याच भागत पाणी साचले असल्याचे म्हणत आदित्य यांनी मुंबई मनपा आणि भाजपवर निशाणा साधला. मुंबईला अर्धवट रस्ते, नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्याने अडचणीत आणले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… गेल्या ३ वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. २०२१/२२ मध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, तेथे आज पुन्हा पाणी साचले आहे. कारण मुंबई मनपाने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकी नाका येथे पाणी साचले होते. आज, असे अनेक भाग आहेत जिथे भाजपच्या भयानक कारभाराचा सामना आपण पाहतोय. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का आहे? की त्यांनी मुंबईला अर्धवट रस्ते, नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्याने अडचणीत आणले आहे? हे पाहणे खूप वेदनादायक आणखी एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘हे पाहणे खूप वेदनादायक आहे. हा परिसर आम्ही ४ वर्षांपूर्वी पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. आज, भाजपने mybmc च्या नियंत्रणाखाली पावसाळ्यासाठी एसओपी न पाळल्यामुळे, तेथे पुन्हा एकदा पाणी साचले आहे.’