भारताच्या भूमिकेची जागतिक स्तरावर ठाम मांडणी:शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य, म्हणाल्या- जगाला भारताकडून खूप अपेक्षा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात अपप्रचार सुरु केला. याला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जागतिक पातळीवर मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदार आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले. या शिष्टमंडळांनी संबंधित देशांतील प्रसारमाध्यमे, बुद्धिजीवी वर्ग आणि सरकारांपुढे भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील शिष्टमंडळासोबत कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त या देशांच्या दौऱ्यावर जाऊन नुकत्याच भारतात परतल्या आहेत. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही भारताच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया व इजिप्त या चार देशांना आम्ही भेट दिली. त्यांच्या नेतृत्वांनी आवर्जून सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत ठामपणे उभे आहोत. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, परदेशातील प्रत्येक बैठकीत स्थानिक नेत्यांकडून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व नेत्यांमुळे निर्माण झालेला 75 ते 76 वर्षांचा प्रवास सातत्याने उल्लेखला गेला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. तिथल्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपण दहशतवादाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी शांततेच्या मार्गानेही वाटचाल करावी, ही भावना प्रत्येक देशाने वारंवार व्यक्त केली. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण कारवाई केली, ती एक प्रतिक्रिया म्हणून अपेक्षित होतीच. ‘तुमच्यावर अन्याय झाला, त्याला उत्तर म्हणून कारवाई केली, हे योग्यच. परंतु, त्यानंतर संयम आणि समजूतदारपणा दाखवून तुम्ही तणाव कमी केला, याचे आम्हाला कौतुक वाटते,’ असे तिथल्या प्रतिनिधिंनी आवर्जून सांगितले, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे त्या देशांशी असलेले नाते, इंदिरा गांधींचे नेतृत्व, डॉ. मनमोहन सिंग यांचे परराष्ट्र धोरणातील महत्त्वपूर्ण योगदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीच्या पुढच्या टप्प्यापर्यंत नेलेला प्रवास यांचा प्रत्येक देशाने आवर्जून उल्लेख केला. तसेच, या चारही देशांमध्ये महात्मा गांधींचा मोठा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले. मी या दौऱ्यावर माझ्या देशासाठी शिष्टमंडळाच्या माध्यमातून गेले होते. मी कोणत्याही सरकारसाठी नव्हते, तर एक भारतीय म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत गेले होते.