धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न:एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती- अनिल गोटे

धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न:एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती- अनिल गोटे

धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल गोटे यांनी ज्या खोलीत पैसे होते त्या खोलीला कुलूप लावले होते. त्यानंतर पोलिसांनी ती खोली उघडून तपासली असता एक कोटी 84 लाख रुपये आढळून आले होते. ही खोली शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बूक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत चौकशीसाठी समिती नेमली आहे. यावर अनिल गोटे यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. यावर अनिल गोटे यांनी अविश्वास दाखवत आणखी एक गंभीर आरोप केला आहे. रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांची वेगाने वाटचाल चालू झाली असून आतापर्यंत गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे. सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच या कामासाठी तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावाही गोटे यांनी केला आहे. एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती याप्रकरणी तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यास आपण आमरण उपोषण आंदोलन करू, असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिला आहे. अनिल गोटे यांनी एसआयटीवर देखील टीका केली आहे. एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती, अशी टीका त्यांनी केली आहे. खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल, तर प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे आणि धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती स्थापन करावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती. दरम्यान, अनिल गोटे यांनी यापूर्वी जयकुमार रावल यांच्या रावल बँक प्रकरणाचा संदर्भ देत सांगितले होते की त्या वेळी सुद्धा एसआयटी स्थापन करण्यात आली होती. परंतु नंतर तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात माझ्याकडे ठोस कागदोपत्री पुरावे आहेत आणि ते मी राज्यपाल, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पाठवले आहेत. मात्र, या प्रकरणात आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे मला या यंत्रणांवर आणि त्यांच्या चौकशीवर विश्वास राहिलेला नाही, असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment