एकनाथ शिंदेंना तुमच्या गळ्यात हार घालायची संधी कधी देणार?:चंद्रहार पाटलांच्या कार्यक्रमात उदय सामंतांचे सूचक विधान, सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का!

महाराष्ट्रात सध्या आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानुसार राज्यात सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे. महायुती सरकारमधील घटक पक्षांनी देखील स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखायला सुरू केलेली दिसत आहे. राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. सांगलीच्या दौऱ्यावर असताना शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. चंद्रहार पाटील यांच्या भाळवणी गावामध्ये उदय सामंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी उदय सामंत यांच्या गळ्यात हार घालत सत्कार करण्यात आला. तेव्हा उदय सामंत म्हणाले, आमच्या गळ्यात हार घातलाय, पण एकनाथ शिंदे यांच्या हातून गळ्यात कधी हार घालायचा? हे लवकर ठरवा, असे उदय सामंत यांनी म्हटले. चंद्रहार पाटलांची ताकद मोठी आहे, पण ते जिथे आहेत तिथे त्यांच्या ताकदीचा उपयोग झाला नाही आणि कधी होणारही नाही, असा टोला देखील सामंत यांनी लगावला आहे. दरम्यान, चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात उदय सामंत यांच्या उपस्थितीत भाळवणी या चंद्रहार पाटलांच्या गावात कार्यक्रम पार पडल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मात्र मोठा फटका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेससोबत वाद घातला होता. हा वाद सांगलीच्या जागेसाठी तसेच चंद्रहार पाटलांसाठी होता. परंतु आता हेच चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जाऊ शकतो.