परीक्षा केंद्रांबाबत बोर्डाचा मोठा निर्णय:गैरप्रकार आढळून आल्यास परीक्षा केंद्राची मान्यता होणार रद्द
फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान, ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून येतील, त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाकडून लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. मागील 5 वर्षात म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2018, 2019, 2020, 2023, आणि 2024 (2021-22 ही कोरोना काळाची वर्षे वगळून) या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले आहेत अशा परीक्षा केंद्रांवर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यंदाच्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षांपासून रद्द करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी व बारावीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षा काळात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.