फडणवीस यांनी शरद पवारांचे कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली का?:संजय राऊतांचा सवाल; म्हणाले- ‘सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल’

फडणवीस यांनी शरद पवारांचे कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली का?:संजय राऊतांचा सवाल; म्हणाले- ‘सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल’

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चिकाटीचे कौतुक केले आहे. त्यात कोणाला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय टीका केल्या तरी त्यांच्यातील गुण तुम्हाला नाकारता येणार नाही. परिश्रम, संयम आणि सातत्य या गुणाची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने देखील स्वीकारायला हवी. पराभव किंवा निवडणुकीतील यश – अपयश अनेक नेत्यांना थांबवत नाहीत. बाळासाहेब ठाकरे देखील अनेक निवडणुका लढले, हारले आणि जिंकले. मात्र ते काम करत राहिले. आता शरद पवार हे सर्वांचे आदर्श आहेत. इतक्या वर्षांनी का होईना, देवेंद्र फडणवीस यांना पवार साहेबांचे हे गुण दिसले. त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे एवढे कौतुक केले. त्यासाठी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेलच. आम्हाला पवार साहेब यांच्या विषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय हे धोरणात्मक असतात. ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते, अशा छगन भुजबळ यांचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले होते. त्यामुळे त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नये. ते अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे देखील कौतुक करतात. उद्या ते नवाब मलिक यांचे देखील कौतुक करतील. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा काही भरोसा नाही. ते कधी कोणावर हल्ला करतील आणि नंतर कौतुक करतील, हे त्यांचे त्यांनाच माहिती. अशा शब्दात राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाहीत मला ज्ञान आहे, त्यानुसार शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाहीत. शरद पवार यांनी राजकारणामध्ये खूप मोठी पारी खेळली आहे. आता शरद पवार प्रत्यक्ष मैदानावर नसले तरी ते कोचिंग-च्या भूमिकेत आहेत. मी त्यांना ओळखतो. त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे. त्यांचे वय आता 85 वर्षांच्या जवळपास आहे. अशा नेत्यांना काम करताना वयाची बंधने नसतात. शरद पवार यांची विचारधारा, त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिका पाहिल्या तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर कधीच जाणार नाहीत, असा मला विश्वास असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेल्या अनेक नव्या पिढ्या शिवसेना सोडून गेल्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीबद्दल काही सांगता येत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल आताचे राजकारण स्वार्थी झाले आहे. प्रत्येकाला आपली प्रॉपर्टी, संपत्ती वाचवायची आहे. शरद पवार यांना सोडून गेलेले फार आनंदी मनाने गेलेले नाहीत. सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. मात्र तहान लागली म्हणून कोणी गटाराचे पाणी पीत नाही. कारण त्यांच्याकडे कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत. त्यामुळे तहान जरी लागली असली तरी कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची? याचा विचार त्यांना करावा लागेल. तेथे आधी गेलेलेच अद्याप धडपडत आहेत. त्यामुळे नवीन जाऊन काय करणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment