सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे?:सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, पीडित कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीला तिच्या सासरच्या कुटुंबीयांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता. तिच्या पती शशांक हगवणे आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिच्यावर दबाव टाकून हुंड्यासाठी 2 कोटी रुपये मागितले होते. या दबावामुळे वैष्णवीने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही अतिशय वेदनादायक घटना आहे. हगवणे कुटुंब मुळशी आणि पुण्यातील मोठे नाव असलेले कुटुंब आहे. त्यांचे आजोबा पंचायत समितीमध्ये अनेक दशेक चांगले काम केले आहे. आताच्या पिढीत काय झाले आहे हे अतिशय धक्कादायक आहे. मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली, एकूण जो रिपोर्ट पोलिस आणि मीडियाकडून आला आहे त्याच्यातून ग्रे एरिया आला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की आत्महत्या आहे तर काहींचे म्हणणे आहे की ही हत्या आहे. सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे? 24 वर्षांची मुलगी होती ती. या कुटुंबाने सहा दशक कॉंग्रेससोबत काम केले आहे. पण आता ही घटना ऐकून धक्का बसला आहे. अशा सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे आणि एक नाही दोन दोन सुनांवर. हा माझ्या मतदारसंघातला विषय आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेले नाही. कारण मला दाखवून द्यायचे होते की तुमच्या घरातल्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार आहे. त्यांच्या सुना जर पोलिस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालू असतील म्हणून मी त्या कार्यक्रमात नाही गेले. कुठली आई स्वतःचे 8 महिन्याचे मूल सोडून आत्महत्या करेल? पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांच्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला न जाण्याचे कारण देखील मी त्यांना आवर्जून सांगितले. त्यांना सांगितले मी की तुम्ही असे करू नका, असे मी त्यांना सांगितले होते. तुम्ही विचार करा 24 वर्षांची मुलगी. तिचे 8 महिन्याचे मूल होते त्या खोलीत. कुठली आई स्वतःचे 8 महिन्याचे मूल सोडून आत्महत्या करेल? तिच्या अंगावरचे वळ बघा. मी फोटो नाही दाखवू शकत. अमानुषपणा होता. मी पोलिसांचे आभार मानते की त्यांनी अटक केली आहे. ते लक्ष घालत आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या घरातील कर्ते पुरुष फरार आहेत. मिसिंग कसे असू शकतात? आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या 24 वर्षांच्या मुलीला या पुरोगामी महाराष्ट्रात न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल ती मी लढायला तयार आहे. महाराष्ट्राच्या या लेकीला न्याय मिळवूनच राहणार, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवला. हा विषय अतिशय गंभीर आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली असून, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी राज्य सरकारने अधिक गंभीरपणे कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, तपास सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारला गंभीर विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. भारतीय सैन्याबाबत कोणताही चुकीचा संदेश जाऊ देता कामा नये दरम्यान, भारतीय सैन्य दलाबाबत कोणताही गैरसमज निर्माण होईल, असा कुठलाही संदेश राजकीय पक्षांनी देऊ नये, यावर सर्वपक्षीय सहमती झाली आहे. आपण सर्वजण भारतासोबत आहोत. या मुद्द्यावर राजकारण होऊ नये, आणि होणारही नाही, असे ठाम मत सुप्रिया सुळे यांनी मांडले. सैन्याशी संबंधित कोणताही विषय हा अत्यंत संवेदनशील असल्याने विरोधी पक्षांनी देखील संयमाने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. सरकारवर टीका करताना आम्ही एक मर्यादा पाळतो, कारण आमचे उद्दिष्ट देशहित आणि लोकहीताचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.