हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र:नाशिकमध्ये मनसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र, भाजपवर केली टीका

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युतीच्या चर्चांना वेग आला असताना, नाशिकमध्ये या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जणू पुढचा टप्पा गाठल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मनसेच्या नाशिकमधील नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र या उद्घाटनप्रसंगी वास्तुशांती पूजाही आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, कार्यक्रमात “हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र” असा संदेश असलेला एक फलक झळकवण्यात आला होता, ज्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे संयुक्त छायाचित्र होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, दोन्ही नेत्यांनी आता एकत्र यावे, ही महाराष्ट्रातील जनतेची खरी गरज आहे. “हिंदुत्वाचा उल्लेख करून भारतीय जनता पार्टीनेच खऱ्या अर्थाने त्याचा अपमान केला,” असा आरोपही या वेळी करण्यात आला. नाशिकमधील हा प्रसंग म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आणि राजकीय समीकरणांचे बदलते वारे यांचे प्रतीक ठरत आहे. डोंबिवलीनंतर नाशिकमध्ये घडलेला हा संवाद आणि एकत्र येण्याचा संकेत आगामी राजकारणात मोठा परिणाम घडवू शकतो. अमित ठाकरे काय म्हणाले? मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची (राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे) इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावे.