हुंडाबळी ही वृत्ती, अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल:दौलतजादा आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग, वैष्णवी हगवणे प्रकरणी नाना पाटेकर स्पष्टच बोलले

हुंडाबळी ही वृत्ती आहे. अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल, अशी प्रतिक्रिया दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर आपले परखड मत मांडले आहे. दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसे समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. नाना पाटेकर म्हणाले, हुंडाबळी ही वृत्ती आहे. अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल. लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि संस्काराचा भाग आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मी असा खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी देईन. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या लग्नात देण्यात आलेला हुंडा व पैशांची झालेली उधळण याची देखील चर्चा सुरू आहे. यावर नाना पाटेकर म्हणाले, दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसे समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही. झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळं चाखायची नाहीत का? लग्नसोहळे हा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. काय मूर्खपणा सुरू आहे, ही चर्चा करण्यापेक्षा मी काय करू शकतो, हा विचार आपण करावा. नाना पाटेकर म्हणाले, सिनेमा हे केवळ करमणुकीचे साधन नाही. समाजातील विसंगती आम्ही मांडतो. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करण्याची वेळ आली आहे. अवकाळी, गारपीट यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पुरेसे नाही. खेड्यात शाळा लांब असल्याने पावसाळ्यात मुलांचे शिक्षण थांबते. हे टाळण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शाळा, वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. आजारी पडणे चैन झाली आहे, अशी वैद्यकीय व्यवस्था आहे, असे ते म्हणाले.

  

Share